षडाष्टकाला काय पर्याय आहे?

उपवर मुलांचे विवाह वेळेवर व्हावेत ही पालकांची अपेक्षा काही गैर नाही. आपल्या हयातीत आपल्या मुलांचे विवाह वेळेवर व्हावेत. त्यांना सर्वसाधरण पणे सु्खी वैवाहीक आयुष्य उपभोगताना पहावे ही पालकांची अपेक्षा गैर नाही. याउलट उपवर मुलांची दुसरी बाजू तितकीच रास्त आहे. अनेक कष्ट करुन, तडजोड करुन ते शिक्षण घेतात, स्पर्धा करुन नोकरी व्यवसाय सुरु करतात त्यात स्थिरता यावी अशी त्यांची विवाहापुर्वी अपेक्षा असते. आपले उत्पन्न आजच्या जोडीदाराच्या अपेक्षां इतके असावे असे त्यांना वाटते. किंवा पुढे जाऊन  घर किंवा वाहन यापैकी अपेक्षा पुर्ण करुन मगच विवाह वेदीवर पाऊल ठेवावे असे त्यांना वाटले तर गैर नाही.

काही वेळा उपवर मुले असे म्हणतात, ज्या ड्रेस/कपडे याचे आयुष्य एखादे वर्षाभर असते त्याच्या निवडीकरता आम्ही एक तास लावतो तर आयुष्यभराचा जोडीदार एका तासाच्या दाखवण्याच्या कार्येक्रमात कसा निवडायचा ? आजकाल उपवर मुला/मुलींना विवाह ठरवण्यापुर्वी एकमेकांशी संवाद साधायची संधी मिळते जी ५० वर्षांपुर्वी नसायची. यातून उपवर मुले एकमेकांचे विचार जाणु शकतात. पण यातही दोष असा असू शकतो. स्वत: मधे जे गुण नाहीत ते आहेत असे वधू-वर एकमेकांना खोटेपणा करुन भासवू शकतात. किंवा दोष लपवू शकतात. यामुळे फ़सगत होऊ शकेल. माणूस समजण्यासाठी केवळ एकमेकांचे विचार समजणे पुरेसे नसते, एकमेकांचा स्वभाव पण जाणणे पण आवश्यक असते. शरद उपाध्ये सरांच्या महाराष्ट्रात प्रसिध्द झालेल्या राशीचक्र कार्येक्रमातून ज्योतिषशास्त्रा विषयी फ़ारशी आस्था नसणार्यांना सुध्दा राशी आणि स्वभाव यांचे नाते पटले असावे. कारण शरद उपाध्ये सरांच्या राशीचक्र कार्येक्रमाला आजवर कुणी आक्षेप घेतल्याचे मला आढळले नाही.

आजच्या मॉडर्न सायन्स मधे सायकोलॉजी विषयात पर्सोनॅलीटी ट्रेट्स हा विषय आहे. स्वभाव आणि पर्सोनॅलिटीचा एकमेकांशी संबंध आहे तसाच तो स्वभाव आणि राशी यांचा ही संबंध आहे. जर राशी व त्यांचे स्वभाव यावर एकमत असेल तर काही राशी एकमेकांच्या शत्रु राशी असतात हे सुध्दा मान्य करायला हरकत नाही. शत्रु याचा अर्थ अगदी एकमेकांचा जीव घ्यायला तयार असलेल्या राशी असा नसून त्याचे सहजीवन सुखद होणार नाही यासाठी शत्रु राशी मानायला हव्यात. शत्रु राशीत सहज संवाद शक्य नसतो. तर सहजीवन सुखद कसे होणार ?

हा विचार पटवून घेण्यासाठी उपवर मुला मुलींनी किंवा त्यांच्या  पालकांनी एक प्रयोग नक्की करुन पहावा. आपले ज्या मित्र मैत्रीणींशी सख्य आहे त्यांच्या राशी आणि ज्यांच्याशी अजिबात जमत नाही त्यांच्या राशी पहाव्यात. ज्यांच्याशी आपला सुखसंवाद होते असे मित्र किंवा मैत्रीणी शत्रु राशीच्या नसतात. एखादी अशी केस आढळल्यास अनेक व्यक्तींचे अनुभव पहावेत आणि मगच मत बनवावे.

यासाठी पुर्वजांनी राशींच्या आधारे सर्वसाधारण गट पाडून या राशींच्या लोकांनी या राशीच्या लोकांशी विवाह केला असता सुखसंवाद होऊ शकेल असे संशोधन करुन आजच्या विवाहगुण मेलनाच्या पध्दती आणि प्रथा विकसीत केल्या आहेत. एकमेकांपासून सहाव्या -आठव्या राशी येतात त्यांचे आपापसात फ़ारसे जमत नाही. त्यातून ज्या राशींच्या स्वामींचे आपापसात शत्रुत्व आहे त्या राशींच्या लोकांचा एकमेकांशी सुसंवाद दुरापास्त असतो. याला ज्योतिषशास्त्रात षडष्ट्क किंवा षडाष्टक किंवा षडाष्टकातील राशी म्हणले जाते.

जेंव्हा उपवर मुले -मुली एकमेकांना भेटतात तेंव्हा स्वभावाचा अंदाज प्रत्यक्ष भेटून लागणे सर्व वेळी संभव नसते कारण अपरीचित मुले -मुली एकमेकांच्या समोर येताना छाप पडावी म्हणून आपला मुळचा स्वभाव प्रगट होऊ नये असा प्रयत्न करतात. शिवाय समोरच्या उपवर मुला/मुलीला अगदी आठ-दहा भेटीत विचार समजतील पण स्वभाव समजेल इतके त्यांचे स्वत:चे आकलन प्रगत असेलच असे नाही. यास्तव विवाह गुणमेलन पध्दती किंवा त्यासोबत येणारे अजुन निकष, जसे मंगळ दोष आणि वैवाहीक सौख्याचे कारक सप्तमेश/शुक्र यांची स्थिती जाणणे म्हणजे फ़ार मागासले पणाचे लक्षण आहे असे मानण्याचे कारण नाही. हे परिक्षण अगदी अल्प किंमतीत आणि जन्मतारीख/ जन्मवेळ  खात्रीलायक रित्या नोंदली असेल तर खात्रीलायक होते.

कोणत्या राशी षडाष्टकामुळे कोणत्या राशींच्या शत्रु असतात हे प्रथम जाणून घेऊ. राशीच्या नावापुढे राशीच्या स्वामी ग्रहाचे नाव आहे.

मेष ( मंगळ ) - कन्या ( बुध )
वृषभ ( शुक्र ) -धनू (गुरु )
मिथुन ( बुध )  - वृश्चिक ( मंगळ )
कर्क ( चंद्र ) - कुंभ (  शनि )
सिंह ( रवि ) - मकर ( शनि )
तुला ( शुक्र )  -मीन ( गुरु )

या राशीचे एकमेकांशी जमत नाही म्हणून दातेपंचांगात पहिल्या कोष्टकात तर X याखुणेने हा विवाह त्याज्य असे सांगीतले आहे. राशीवर आधारीत प्रार्थमीक कोष्टक जे पालक किंवा उपवर मुले ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेऊन, आधी गुणमेलन किंवा अन्य निकषावर पत्रिका जुळत असेल तरच पुढे जायचे यावर ठाम असतात त्यांच्या साठी आहे. यापुढील सुधारीत कोष्टके उपवर मुला-मुलीने एकमेकांना पसंत केले आहे. प्रेमविवाह करायचा आहे त्यांच्या साठी आहे. दाते्पंचांगातील अभिनव विवाहमेलन कोष्टक अजून सुक्ष्म आहे आणि राशी ऐवजी त्यात समावेश असलेली नक्षत्रे आणि त्यांची चरणे इतका सुक्ष्म विचार यात करुन विवाह करणे योग्य अथवा अयोग्य हा निर्णय गुणमेलन या निकषासाठी दिला जातो.

या दोन्ही कोष्टकात जर विवाह गुणमेलन जमत नसेल तर तिसरा पर्याय वधु-वरांच्या नवमांश कुंडलीमधील नवमांश ( नवांश ) स्वामी यांची मैत्री असेल तर करावा असा स्पष्ट निर्वाळा दातेपंचांग देते.

असे असताना, अनेकदा पालक/ उपवर मुले हवालदील होतात. याचे कारण दुसर्या आणि तिसर्या सुक्ष्म पध्दती फ़ारश्या प्रचलीत नाहीत किंवा पालक त्याला विषाची परिक्षा समजतात. दातेपंचांग हे अभ्यासपुर्ण पध्दतीनेच हा निर्वाळा देत असल्याने असे समजायचे कारण नाही.

सर्वप्रथम मृत्यु षडाष्टक ह्या शब्दाची भिती काढून टाकायला हवी. जर षडाष्टकातल्या राशींच्या पती-पत्नीमधे  सुसंवाद नसेल, मिनीटा मिनीटाला खटके उडत असतील तर ते नाते मृतवत होते असा त्याचा अर्थ आहे. प्रेम नसलेले नाते मृत्युसम द:ख देते म्हणुन यास मृत्यु षडाष्ट्क म्हणले आहे.  कधी तरी चुकून कोणी ज्योतिषी एखाद्याचा असा विवाह केल्यास वधू- वरांपैकी एकाचा मृत्यु संभवतो असे म्हणत असतील तर ते मात्र चुकीचे आहे.

पुर्वी प्रेमविवाहा पासून परावृत करण्यासाठी ही भाषा सर्रास वापरली जायची. वधू/वरांना फ़ारसा अभ्यास करण्याची सोय तेंव्हा नव्हती. मध्यंतरी प्रेमविवाह करु इच्छिणारा एक जातक स्वत: अभ्यास करुन माझ्याकडे खात्री करण्यासाठी आला तेंव्हा मी माझ्या अभ्यासाने अजून एक निकष वापरुन हा प्रेमविवाह सुखाचा होईल असा सल्ला दिला.

साध्या कोष्टकात X याखुणेने हा विवाह त्याज्य असे सांगीतले आहे तर अभिनव कोष्टक पहावे, त्याही पुढे आवश्यकता असेल तर नवांशस्वामीची मैत्री पहावी. जर अभिनव कोष्टक आणि नवांश स्वामींची मैत्री ह्या निकषावर विवाहगुणमेलन योग्य असेल तर सप्तमावर गुरुची दृष्टी पहावी, दोघांपैकी एकाच्या पत्रिकेत ती येत असेल आणि दोघांचेही सप्तमेश आणि शुक्र निर्दोष असतील तर हा विवाह जरुर करावा असे माझे मत आहे. अर्थात उपलब्ध विवाहमुहूर्तापैकी वधूवरांना लाभणारा मुहूर्त घ्यावा व वैदीक पध्दतीने विवाह करावा हे आग्रहाने सांगणे आहे. यामुळे विवाहसंस्कार गंभिरतेने वधू-वर घेतात आणि कठीण प्रसंगी विवाह टिकवण्याची मानसीकता वाढते.

No comments:

Post a Comment