Wednesday, November 8, 2017

१६ नोव्हेंबर २०१७ ते १५ डिसेंबर २०१७ महिन्याचे राशीभविष्य

१६ नोव्हेंबर २०१७ ते १५ डिसेंबर २०१७  महिन्याचे राशीभविष्य पाहू. या आधी काही काळ या पध्दतीने रवि ज्या महिन्यात राशीबदल करतो तो डोळ्यासमोर ठेऊन भविष्य लिहीत होतो यात काही कारणाने खंड पडला होता.

मागे मी लिहले होते की दर इंग्रजी महिन्याच्या १४ ते १६ या तारखांच्या दरम्यान रवि राशी बदल असतो. हा निरयन राशी बदल म्हणुन ऒळखला जातो. कोणतातरी काळ निश्चित करुन राशीभविष्य लिहीण्याची पध्दत आहे. मी रविराशीबदलाचा काळ निवडतो. याला रविमास म्हणजे रवि महिना म्हणतात.

या महिन्यात मी येणारे सण किंवा व्रत याबाबत लिहीत असतो. १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या रविमासात रवि वृश्चिक राशीत असणार आहे. या वर्षी ३० नोव्हेंबर २०१७ ला मोक्षदा एकादशी येत आहे. या एकादशीला गीताजयंती म्हणुनही ओळखले जाते. ज्यांनी फ़ारसे वाचन केले नाही ते विचारतील की गीताजयंती म्हणजे काय ? या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगीतली म्हणुन ही गीता जयंती. ज्या पार्थाला ती गीता समजली त्याचा मोक्षाला जायचा मार्ग मोकळा झाला. आपण सर्व अर्जून तर आहोत. प्रत्येकाला प्रश्न पडतोच की मी हे कर्म का करतो.  तुकाराम महाराजांनी तर " रात्रंदीन आम्हा युध्दाचा प्रसंग " असा अभंग लिहलाय.

हे जर पार्थासारख्या कृष्ण सहवासात राहिलेल्या भक्ताच्या बाबतीत होत. जगतगुरु तुकाराम महाराजांनी ही वर्णन केलय तर आपण तर अतिसामान्य आहोत. याचा अर्थ त्या साक्षात्काराला सामोरे जायचेच नाही का? एकादशी व्रत यासाठीच असतात, ज्योतिषशास्त्र दृष्ट्या रवि आणि चंद्र यांचा नवपंचम अर्थात अत्यंत शुभ असलेला ग्रहयोग दर महिन्यात दोनदा येतो.

या दिवशी मन आणि आत्मा एकरुप होण्यासाठी आवश्यक ते वातावरण पृथ्वीतलावर असते. आणि म्हणुन एकादशीला आत्मतत्वाचे चिंतन आणि मनन उपवास करुन करावे असे भागवत धर्म सांगतो. या निमीत्ताने हे आपल्या वाचनात असावे या साठी हा उल्लेख. उपवास करा किंवा जमत नसेल तर करु नका पण आत्मचिंतन या दिवशी नक्की करा.

( हे भविष्य चंद्र रास व लग्न रास दोन्ही कडुनही वाचावे )

आता राशीवार भविष्य पाहू

मेष रास: दिवाळी आपणास आरोग्यदायी गेली नसेल तर महिना अखेरीस आपले आरोग्य सुधारेल. शुक्र जेव्हा आठव्या स्थानी जातो तेव्हा कष्टाशिवाय येणारी संपत्ती चालून येण्याचे योग येतात. लॉटरी असो वा लाचलुचपतीने येणारे धन असो. कुठे थांबायचे ते आपण ठरवा. २६ नोव्हेंबर नंतर असे योग जास्त संभवतात व धोका सुध्दा संभवतो. मनस्ताप ही त्या सोबत नक्कीच असतो.
सातव्या स्थानी जाणारा मंगळ काही व्यावसायीक हालचाली घडवेल. जे व्यवसाय करतात त्यांनी याची प्रचिती येईल. व्यावसायीकाने सातत्याने संधीच्या शोधात असावे. या महिन्यात तर आपणच प्रपोजल घेऊन पुढे जावे असे ग्रहमान आहे. लगेच काही घडेल असे नाही. याचा अर्थ प्रयत्न करायचा नाही असे मात्र नाही. विद्यार्थी जर परिक्षा देणार असतील तर जरा जास्तीचा अभ्यास करावा. महिलांनी अरोग्य सांभाळावे.

वृषभ रास : आपल्या राशीचा स्वामी जो तुळ राशीत आहे तो २६ नोव्हेंबरला वृश्चिक राशीत म्हणजे सातव्या स्थानी जात आहे. २६ नोव्हेंबर नंतर लंग्नासाठी इच्छुक व्यक्तींच्या समोर एखादे प्रपोजल नक्कीच असेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका असे हा महिना सांगतो. खास करुन मुळव्याधीने त्रासलेल्या पेशंट नी महिनाभर दुपारी जेवणानंतर गोड ताक प्यावे. आवळा, पेरु व ताक या रोगावरचे रामबाण उपाय आहेत.

माझ्या गुरुंनी मुळव्याधीवरचा सांगीतलेला मंत्र अजुनही स्मरणात आहे. ज्यांना हा त्रास आहे मग ते कोणत्याही राशीचे असोत याचा जपा करावा. तिखट खाणे कमी करावे.

ईशं, ईशो, ईशान
कंकर को न करो लालेशाम
सात अक्षर जो पड पावे
मुळ बवासीर होय न होये

वृषभ राशीचे लोक बैलासारखे काम करतात. हे जर खुर्चीवर बसुन असेल तर मुळव्याध जडणार. म्हणुन हा प्रपंच. त्यातून जेव्हा मंगळ सहाव्या स्थानी जातो किंवा वृश्चिकेत जातो ( १७ जानेवारीला जाणार आहे ) आधीपासूनच तरुणांनी काळजी घ्यावी. वय ४० नंतर हा रोग सहसा त्रास देत नाही.

विद्यार्थ्यांनी आपल्या मित्राजवळ बसून अवघड विषय समजून घ्यावेत. परिक्षा या महिन्यात असेल तर अभ्यास जास्त करावा. १० डिसेंबर नंतर पेपर असेल तर त्याचा खुपच जास्त अभ्यास करावा. महिलांना खास करुन हा महिना उत्तम जाईल.

मिथुन रास : कलाकार व्यक्तींना १६ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर ही पर्वणी आहे असे समजा. खास करुन आर्द्रा नक्षत्राच्या लोकांना कलेपासून लाभ मिळण्याचे योग आहेत. एखादी नविन कलाकृती त्यांच्या कडून निर्माण होईल. तसेच महिनाभर  जुनी येणी वसूल व्हावीत असे योग आहेत. २४ नोव्हेंबर नंतर नविन प्लॅटफ़ॉर्म मिळेल. कलाकार विद्यार्थी परिक्षा देत असतील तर यश नक्कीच आहे. महिलांना मनाप्रमाणे घडेल असे योग २६ नोव्हेंबर पर्यंत नक्कीच आहेत.

सरकारी नोकरी ज्यांना मिळावी असे वाटते त्यांनी ह्या महिन्यात असलेली लेखी परिक्षा किंवा मुलाखत चुकवू नका.

कर्क रास : सध्या घरात चांगले वातावरण २९ नोव्हेंबर नंतर घराचे चित्र पालटेल. महिनाभर किंचीत विवाद व्हावेत असे ग्रहमान आहे. गुरु महाराज चतुर्थात बसले आहेत. फ़ार काही बिघडवू देणार नाहीत. पण कर्क राशीच्या महिला मात्र जरा काही झाले की डोळ्यात गंगा- जमुना असतात. म्हणुन काही बिघडु द्यायचे नाही असा संकल्प केलात तर हा घरातला मनस्ताप टळेल.

पुष्य नक्षत्राला त्रास आहे पण ज्याला त्रासातही सुख म्हणावे लागेल असे काहीसे ग्रहमान आहे. गुरुची दृष्टी आपल्या कर्मस्थानी आहे त्यामुळे नोकरी व्यवसायाला गती असणार आहे. काही त्रास तिथली घडी जर बसली नसेल तर असू शकतात.

आश्लेषा नक्षत्राला हाच काय पुढील काही महिने धनलाभाचे आहेत. एकंदरीत मिश्र अश्या स्वरुपाचे ग्रहमान कर्क राशीला आहे. महिलांना भुरळ पडावी असे काहीसे ग्रहमान आहे. सोनेरी मृग नसतो ते संकट आहे असे ध्यानी ठेवावे. उच्च पदवी परिक्षा सोडता शाळा/ कॉलेजातील विद्यार्थ्यांना झटून अभ्यास करावा लागेल.

सिंह रास : धाड्स करायला २९ च्या मंगळाच्या राशीबदलानंतर बाहू स्फ़ुरण पावतील असे ग्रहमान आहे. मघा नक्षत्र वाल्यांनी धाडस टाळावे. मघा आणि पुर्वा नक्षत्रांच्या लोकांना काही चांगले मित्र या महिन्यात भेटतील. त्यातील काही स्त्रीया तर उच्च पदस्थ व्यक्ती असतील. आपले नोकरी व्यवसायातील अडलेले काम त्यांना अंदाज घेऊन सांगून पहा. नुकतीच ओळख झाली म्हणजे कामे होणारच नाहीत असे काही नसते.

सिंह राशीच्या सर्वच लोकांनी आपल्या मुलांकडे/त्यांच्या प्रगतीकडे लक्ष द्या. हा तुमचा स्वभाव नसेल तर आपल्या जोडीदाराला हे काम सांगा. शेवटी डिस्कव्हरी पाहिल्यावर कळते सिंहीणीला शिकार करणे, बालकाचे संगोपन करणे एक ना दोन अनेक कामे करावी लागतात. स्त्री असाल तर ही जबाबदारी पुढे काही दिवस आपल्याकडे असणारच आहे. सिंह पुरुष फ़क्त जेंव्हा संकट येते तेंव्हाच धावतात. 

महिला जरा शांततेने घरात राहून सुख अनुभवतील आणि विद्यार्थी  वर्ग सकाळी उठुन अभ्यासाची सवय लावाच. लक्षात छान रहाते.

कन्या रास : २४ नोव्हेंबर पर्यंत लिखाण, चिकीत्सा, टीका स्फ़ुट लेखनासाठी चांगला काळ आहे. अनेक नविन गोष्टी स्फ़ुरतील किंवा प्रसिध्द ही होतील. आजकाल डिजीटल मिडीया फ़ास्ट असल्याने मनात आले लिहले, क्लिक केले की प्रसिध्द झाले असे तंत्र आहे. चांगल्या लिखाणाला तासाभरात १०० लाईक्स मिळतात. पटत नाही तर पुण्याच्या पांडुरंग कुंभार या फ़ेसबुक लेखकाला फ़्रेंड रिक्वेस्ट टाका आणि पहा. त्यांना १०० लाइक्स मिळतात. तुम्हाला १० तर मिळतील. शेवटी व्यक्त व्हायला हवे मग ते मित्रांपाशी किंवा फ़ेसबुक मित्रांपाशी.

चवथा शनि म्हणजे छोटी पनवतीच असते. डोक्यावर बर्फ़, तोंडात साखर ठेवा. हा महिनाभर तर खासच आवश्यक आहे. कन्या राशीच्या लोकांना ना शारिरीक बळ ना तोंडात दम. जे काय दाखवायचे ते आपल्या कामातूनच. त्यात समय कठीण येता कोण कामास येतो? असे ग्रहमान आहे. ती एक फ़ाईट तुमच्या बुध्दीमत्तेवर  तुम्ही शत्रुला मारणार पण आत्ता नाही. जरा दमाने घ्या.

महिलांची दिवाळी संपली असेल तर जरा कामाचे पहा. विद्यार्थ्यांनो मित्र असे जोडा की जे कामाचे आहेत.

तुळ रास : २९ नोव्हेंबर पासून आपल्या राशीच्या लोकांचा पैसा एफ़ डी, सोने यात गुंतवला जावा असे योग आहेत. आपले रोकड रक्कम यात वाढ होईल. विशाखा नक्षत्र वाल्यांना हा अनुभव नक्कीच येईल. आलेले पैसे तुम्ही असेच खर्च करुन टाकणार नाही. स्वाती नक्षत्र सुध्दा याचा अनुभव घेईल. यासाठी २९ नोव्हेंबर पर्यंतचा कालावधी जास्त अनुकूल आहे.

सर्व तुळ राशीचे लोक  भेळ, पाणीपुरी अश्या चटकदार पदार्थांचा मनमुराद आनंद घ्याल. तुळ रास वाल्यांच्या घरी पाहूण्या स्त्रीया, माहेरवाशीणी यांचे आगमन होईल आणि घर भरुन जाईल. एकंदरीत महिलांनी आनंद लुटावा असा महिना आहे तर.  विद्यार्थी वर्गाने पुढचे काही महिने दररोज अभ्यास करावा. यश नक्कीच आहे.

वृश्चिक रास : गेले महिनाभर गुरु बाराव्या स्थानी त्यात रवि सुध्दा आणि शुक्र सुध्दा. खर्चाने गांजला असाल तर आता या महिन्यात खर्च आटोक्यात येतील. नोकरी निमीत्त अचानक प्रवास सुरु असेल तर तो ही थांबेल. काही योजना आखली असेल तर २९ नोव्हेंबर पर्यंत यशदायी होण्याचे योग आहेत. दरवेळेला गुप्तता राखावी असे काही नसते. काही वेळा सहज बोलून काम होते.

साडेसातीचे शेवटचे पर्व जरा अडचणीचा त्रास वाढवते असे तुमच्या बाबतीत होणार आहे. पण घाबरुन जाऊ नका. शनिदर्शन शनिवारी घ्या. वार्षीक राशीभविष्यात सांगीतलेला जप सुरु ठेवा.

महिलांनी आरोग्य संभाळा. अनुराधा नक्षत्राच्या महिलांनी विशेष काळजी घ्यावी. विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे असेल तर कालावधी उत्तम आहे. माहिती घ्या . फ़सगत होऊ नये.

धनु रास : मुळ नक्षत्रात शनि महाराजांचे आगमन आहे. ज्यांचे चरण १ आहे. मनस्ताप आहे. त्यात महिनाभर भाग्याचा स्वामी रवि बाराव्या स्थानी त्यामुळे प्रवास आहे. प्रवासात वस्तु गहाळ होणार नाहीत असे पहा. खर्च ही २६ नोव्हेंबर पासून वाढत आहे. आधीच तजवीज करा. आरोग्य संभाळा. काही नविन मित्र जोडले जाणार असे दिसते. अनेक कामे मित्रांचा सल्ला घेतल्याने मार्गी लागतील असे दिसते.

तरुणांना काही लक्षात राहतील असे प्रसंग येणार आहेत. बरेचसे मधुर, काहीसे कटु असे एकंदरीत या महिन्यात येणार्या प्रसंगांचे प्रकार आहेत. महिना फ़ार उत्तम असेल असे नाही. पण फ़ार कठीण नाही.

महिलांना महिनाभर खर्च करावा अशी इच्छा होईल. पहा अनावश्यक खर्च टाळता येतो का ? विद्यार्थी वर्ग या महिन्यात परिक्षा असतील तर चमकणार आहात. खेळाडु असाल तर एखादी स्पर्धा गाजवणार आहात.

मकर रास: नुकतीच साडेसाती सुरु झाली आहे त्याचे फ़ार परिणाम लगेच दिसत नाहीत. पण दर शनिवारी शनिदर्शन सुरु करा. महिना लाभाचा आहे. इश्नुरन्स , लॉटरी यातून या महिन्यात काही अनपेक्षीत धन अपेक्षीत आहे. नोकरी व्यवसायात महिनाभरात थोडी धावपळ वाढेल. या महिन्यात तरी फ़ार काही सनसनाटी घडावे असे योग नाहीत.

महिला वर्गाच्या अपेक्षा पुर्ण होतील. विद्यार्थी वर्गालाही जे हवे ते शैक्षणीक मिळवण्याचा हा महिना आहे. संकल्प करा यशस्वी व्हा.

कुंभ रास : तुमच्या कामाच्या ठिकाणी एखादा छोटासा अधिकार तुम्ही मागत आहात तो तुम्हाला मिळुन जाईल. याचा अर्थ प्रमोशन आहे असे नाही. काही विषीष्ठ कामासाठी तुम्हाला परवानगीची आवश्यकता लागणार नाही. तुमच्या कुंडलीला बदललेला शनि लाभदायक असेल. खडतर अश्या कामातुन थोडी उसंत मिळेल व मनाप्रमाणे लाभ ही मिळतील अशी या शनिबदलामुळे घडणार आहे त्याचे प्रत्यंतर या महिन्यातच येईल.

भाग्यस्थानी गुरु आणि बाराव्या स्थानी केतू हे वर्षभर तिर्थयात्रा यांचे योग येणार आहेत. या ही महिन्यात संधी आहेच.

महिलांचे महिनाभर घरात वर्चस्व असणार आहे. त्यामुळे कुंभेची पत्नी असणार्यांनी तर एक महिना त्यांच्या कलानेच घ्या.

विद्यार्थी वर्गाला यश मिळणार आहे. १० डिसेंबर पुर्वी महत्वाचे सबमिशन इ. शैक्षणीक कामे मार्गी लावा.

मीन रास: महिनाभर काही अप्रिय घडत असेल तर हा काळ संपत आला आहे. जोडीदाराबरोबर शाब्दीक चकमकींना तसा अर्थ नसतो. पण शब्द जपून वापरले की बरेच अनर्थ टळतात. अजुनही आरोग्याकडे लक्ष द्यावे असा महिना आहे. फ़ार काही नेत्रदिपक गोष्टी घडण्यास अजून एखादा महिना वाट पहावीच लागेल. तो पर्यंत आहे त्या पानावरुन पुढे चालू असे साधे सुधे ग्रहमान आहे.

महिलांना नवी दिशा सापडेल. विद्यार्थी वर्ग आपली फ़सगत होणार नाही यासाठी लक्षपुर्वक अभ्यास करा. या महिन्यात परिक्षा असेल तर जास्त लक्षपुर्वक गोष्टी करा. अचानक पेपर लिहला पण रोल नंबरच लिहला नाही अश्या चुका होणार नाहीत याकडे लक्ष द्या.

शुभंभवतु

Tuesday, November 7, 2017

IVF सक्सेस स्टोरी

कालचा दिवस म्हणजे ६ नोव्हेंबर २०१७ माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस होता. माझ्या जातकजोडप्या पैकी पुरुषाचा फ़ोन आला व त्याने त्यांना कन्या संतती झाल्याची गोड बातमी दिली.  हे जोडपे माझ्या संपर्कात मागच्या वर्षी डिसेंबर २०१६ मधे आले. संतती हा प्रश्न होता. स्त्रीच्या फ़ेलोपीन ट्युब्ज ब्लॉक असल्याने स्त्रीबीज गर्भाशयात येत नव्हते. यावर IVF अर्थात टेस्ट ट्युब बेबी हा प्रयोग डॉक्टरी शास्त्रानुसार सुरु होता.

IVF तसे तंत्र काही नविन नाही. १९७८ साली ह्याची सुरवात झाली. ज्या स्त्रीयांच्या फ़ेलॊपीन ट्युब्ज ब्लॉक आहेत अश्यांना संतती देण्यासाठी हे तंत्र उत्तम आहे. या तंत्रात स्त्रीचे स्त्रीबीज जे फ़ेलॊपीन ट्युब वाटे गर्भाशयात येऊ शकत नाही ते शस्त्रक्रियेने बाहेर काढून पुरुष बीजाशी त्याचा संयोग शरीराबाहेर घडवून पुन्हा पाच सहा दिवसांनी गर्भाशयात सोडले जाते.  यामुळे मासीक पाळी बंद होण्याच्या वयात सुध्दा स्त्रीया माता होऊ शकतात.

भारतात हर्षा वर्धन रेड्डी बुरी या भारतीय पहिल्या टेस्ट ट्युब बेबीचा जन्म १६ ऑगस्ट १९८६ साली झाला. माझ्याकडे हे जोडपे आले तेव्हा या प्रयोगाला २०१६ साली ३० वर्षे पुर्ण होऊन गेलेली होती. दुदैव असे की या जोडप्याची IVF आधी पाच वेळा फ़ेल गेली होती. कारण तसेच आहे. या प्रयोगात भारतात ५५ ते ६० % वेळेला यश मिळते. याचाच अर्थ हा प्रयोग अनेक वेळा केला तरच यशस्वी होतो. इथे खरे ज्योतिषशास्त्र काम करु शकते. जेव्हा हा प्रयोग यशस्वी होण्याची ज्योतिषशास्त्राने शक्यता आहे तेव्हा हा प्रयोग केला तर कमी वेळा प्रयोग करुन अर्थात कमी खर्चात जोडपे आपल्या अपत्याला जन्म देऊ शकेल. प्रयोग अनेक वेळा फ़ेल गेला की मन उदास होणे, मुल होण्याची उमेद संपणे ही मानसीक स्थिती न येता जोडपे दोन चार प्रयत्नात आनंदी होऊ शकेल.

मी या जोडप्याच्या पत्रिका तपासून संतती सुखाच्या शक्यता पाहिल्या. मला असे लक्षात आले की नजीकच्या महादशा अंतर्दश्या तसेच गोचरीचे ग्रह ही ह्या स्त्रीला गर्भधारणेसाठी अनुकूल आहेत. याच काळात जर गर्भधारणा झाली तर ही स्त्री आई होण्याची शक्यता अधीक असल्यामुळे मी त्यांना काही तारखा सजेस्ट केल्या.

१८-४-२०१७ हा दिवस माझ्यासाठी ह्या जोडप्याच्या इतकाच आनंदाचा होता कारण ह्या जोडप्याची IVF या वेळेला यशस्वी होऊन ती स्त्री गर्भवती झाली होती.

हे यश हातातून जाते आहे की काय अशी परिस्थिती एका सोनोग्राफ़ी परिक्षेनंतर आली. मला त्या स्त्रीचा फ़ोन आला की तीच्या जुळ्या मुलापैंकी एकाचे हृदयाचे ठोके बंद पडले आहेत. आता काय करायचे ? मी त्यांना गर्भ संरक्षक देवता श्रीकृष्ण आणि कुलदेवीची आराधना करायला सांगून माझ्या देवाची आराधना केली. माझे दोन चार दिवस अस्वस्थतेत गेले. मला फ़ोन करायची छाती होईना. सातव्या दिवशी माझी चुलत बहीण आली आणि तीने मला तीच्या जावेच्या तीळ्या पैकी एकाचे ठोके बंद झाल्यावर जुळे जन्माला कसे आले याची कहाणी सांगीतली. मी लगेच इंटरनेटवर पाहीले असता. http://americanpregnancy.org/multiples/vanishing-twin-syndrome/ हा कन्सेप्ट वाचनात आला. ज्यात स्पष्ट उल्लेख होता की जुळ्या मुलांच्या गर्भापैकी एकाचे ह्रुदय बंद पडले तर पहिल्या तीन महिन्यात तो गर्भ आतल्या आत जिरतो आणि दुसरे बालक सुखरुप जन्माला येते.

ह्या स्त्रीने ज्या अर्थी मला फ़ोन केला तेव्हा त्यांच्या डॉक्टर्स ना हा कन्सेप्ट माहित नव्हता ? त्यांनी ह्या स्त्रीला घाबरु नकोस तुला अजुन तीन महिने व्हायचे आहेत. पहिल्या तीन महिन्यात एक बाळाचा गर्भ जिरुन दुसरे बालक सुखरुप जन्माला येण्याची शक्यता खुपच जास्त आहे हे सांगायला नको होते ? कधी कधी मला डॉक्टर्स असे का वागतात याची कारणे समजत नाहीत.

हे ज्ञान किंवा कन्सेप्ट डॉक्टर्स नी सांगीतला असता तर ती गर्भवती तणावाखाली येऊन मला फ़ोन केला नसता. मी काय केले फ़क्त विश्वास दिला. हेच डॉक्टर्स ने करायला हवे होते.

मग ह्या जोडप्यातील पतीचा फ़ोन दोन चार दिवसापुर्वी आला. सिझेरीयन साठी योग्य दिवस कोणता असे तो विचारत होता. मी ही ह्या दिव्यातून नुकताच गेलो होतो. माझ्या मुलीने सिझेरीयनने तीच्या मुलाला नुकताच जन्म दिला. तेंव्हा आपल्या समुहावरील विजयानंद पाटील यांच्याशी मी चर्चा केली असता यात फ़ार ढवळा ढवळ न करण्याचा सल्ला त्यांनी दिला. मला ते म्हणाले की श्रीकृष्ण देवता गर्भरक्षक आहे. स्मरण करा आणि बाकी डॉक्टर्स वर सोडा. मी माझ्या स्वत: च्या बाबतीत स्वत: चे डोके चालवत नाही. नेहमी आपल्या पेक्षा अनुभवी लोकांचा सल्ला घेतो.

दोन चार दिवसामागे हाच सल्ला मी दिला. काल फ़ोन आला की या जोडप्याला कन्या रत्न झाले आहे. काल पासून मी खुष आहे. माझा ज्योतिषीय प्रयोग यशस्वी झाला. ही माझी नाही तर त्या जोडप्याची सुध्दा खात्री आहे.

आता तांत्रिक बाबी कडे जाऊ. जर स्त्रीचा पंचमेश बिघडला असेल तर वर उल्लेखली त्या प्रमाणे गर्भधारणेत अडचणी संभवतात. या IVF तंत्राने दुर होण्यासारखी परिस्थिती असेल तर ती स्त्री गर्भवती होऊ शकते. पण तांत्रीक बाजू पाहिली असता स्त्रीच्या गर्भाशयातून स्त्री बीज बाहेर काढणे, त्याचा पुरुष बीजाशी संयोग घडवणे आणि ते पुन्हा ५-६ दिवसांनी फ़लीत झाल्याची खात्री करुन गर्भाशयात सोडणे, गर्भाशयाने ते स्वीकृत करुन गर्भाची वाढ होणे यात गुरु ग्रहाचे मोठे कार्य असते. मुळ पत्रिकेत अनेक वेळा पंचमेश सुस्थितीत असूनही स्त्रीचा गुरु वक्री किंवा अशुभ स्थानी असता , त्याच्या सोबत युतीत व्ययेश असता किंवा अशुभ ग्रहांची दृष्टी असता हे कार्य खात्रीने होत नाही.

सर्व ज्योतिषी हेच छाती ठोक पणे सांगतात की तुमच्या पत्रिकेतले शुभ ग्रह आयुष्यभर शुभ फ़ळे देत नाहीत. त्यांच्या महादशा/अंतर्दशा असताना, गोचर ग्रह अनुकूल असताना जास्त फ़लदायी होतात. तसेच अशुभ ग्रहांचे असते. जेव्हा अशुभ ग्रह त्यांच्या महादशा/अंतर्दशा असताना जास्त अशुभ फ़लदायी होतात.

मी  यात अचुक काळ शोधला ज्या काळी पंचमेशाचे अशुभत्व कमी होऊन गर्भ धारण होईल तसेच गुरु अनुकूल असल्यामुळे गर्भाची वाढही खात्रीने होईल. या पध्दतीने अनेक वेळा हा प्रयोग करायला मिळाला तर IVF चे फ़ेल्य़ुअर प्रमाण कमी होऊन जोडप्याचा खर्च वाचेल आणि धीर ही खचणार नाही. अश्या जोडप्यांनी माझ्याशी संपर्क करावा यासाठी हा लेखन प्रपंच.