Sunday, August 27, 2017

सप्टेंबर २०१७ चे राशीभविष्य आणि नक्षत्रप्रकाशच्या दिवाळी अंकांची घोषणा.

ज्योतिषप्रेमी लोकहो, सप्टेंबर महिन्याचे राशीभविष्य आपल्याला सुपूर्त करताना मनात खुप आनंद होत आहे याचे एक कारण दरमहिना राशी भविष्य लिहीण्याचा संकल्प करुन एक वर्ष पुर्ण होत आहे. २०१६ सप्टेंबर पासून मी राशीभविष्य लिहायला सुरु केले. नक्षत्रप्रकाश दिवाळी अंक २०१६ लगेचच प्रसिध्द केला. याला वाचकांचा खुप प्रतिसाद मिळाला.

आता नक्षत्रप्रकाशचा दिवाळी अंक ३० सप्टेंबर २०१७ रोजी म्हणजे दसर्याच्या मुहूर्तावर फ़ेसबुकवर प्रसिध्द करण्याचा मानस आहे. त्यामुळे ज्यांनी फ़ेसबुकच्या नक्षत्रप्रकाश ज्योतिष समुहावर आपले सदस्यत्व नोंदवले नसेल त्यांनी त्वरेने नोंदवा कारण हा अंक इथे प्रथम प्रसिध्द होईल. अर्थात अनेक लोकांना याची लिंक पुढे पाठवायला मी प्रोत्साहन देतो त्यामुळेच वाचकांची संख्या वाढते. नेहमी प्रमाणे दिवाळी अंकातही ज्योतिष विषयक अनेक लेख असतील व वार्षिक राशीभविष्य ही असेल यामुळे अक्टोबर महिन्याचे वेगळे राशीभविष्य असणार नाही.

सप्टेंबर महिन्यात दोन महत्वाचे ग्रह राशीबदल करत आहेत. ८ सप्टेंबरला राहू व केतू राशी बदलत आहेत. याचे स्वतंत्र भविष्य मी आधीच प्रसिध्द केले आहे. http://gmjyotish.blogspot.in/2017/08/blog-post.html याच बरोबर या महिन्यात १२ तारखेला गुरु ही तूळ राशीत जात आहे. शनि पुढील महिन्यात पुन्हा धनू राशीत जात आहे. याचे एकत्रित परिणाम मी दिवाळी अंकात देईनच पण तो पर्यंत या महिन्याच्या भविष्यात काही तात्कालिक परिणाम वाचा.

राहू जेव्हा राशी बदलतो तेव्हा त्याचे परीणाम अकस्मात आणि जोरदार घडतात. याची चुणूक या महिन्यात दिसेलच. पाहूया राशीवार भविष्य,

मेष रास: या महिन्यात १२ सप्टेंबरला गुरू सप्तमात येत आहे. ८ सप्टेंबरला राहू चतुर्थात येत आहे. पंचमात असलेला मंगळ खेळ खेळण्यात महिनाभर उत्साह येईल. चतुर्थातला राहू सुखस्थानी आल्याने आपल्या सुख कमी होणार आहे. घर बदलण्याचे योग येऊ शकतात. यामुळे नविन घरी जागा बदलल्यामुळे झोप न लागणे, वस्तु जागेवर न सापडणे असे घडेल त्यामुळे किंचीत अस्वास्थ्य येऊ शकते. अनेकांना काहीना काही कारणाने घर बदलावे लागेल , शहर बदलावे लागेल यामुळे रोजची घडी विस्कटली जाऊनही अस्वास्थ्य येऊ शकते. व्यावसायीक लोकांना व्यवसायस्थानी गुरु आल्याने व्यवसाय वृध्दी अनुभवायला मिळणार आहे . अगदी लगेचच नाही पण आपल्या उत्पन्नात वाढ होणार आहे. चंद्रावर गुरुची दृष्टी वर्षभर पडल्याने मेषेच्या मुलींची तर लग्ने वर्षभरात होतील. पण मुलींनी स्थळ पहायला होकार द्यायला हवा. मगच पालक हालचाल करु शकतील ना ?
वृषभ रास: या महिन्यात तुमच्या सुखाच्या स्थानी ग्रहांची गर्दी या महिन्यात आहे. रवि, मंगळ आणि बुध हे आहेतच शिवाय  १५ तारखेनंतर राशीचा स्वामी शुक्र  सुखस्थानात आल्याने  सुखात भर पडेल.शुक्र चतुर्थात असताना वाहन सुख, घरात उत्तम कौटुंबिक वातावरण असल्याने मिळणारे सुख वाढते. तुम्ही कष्ट करायला कंटाळत नाही पण या महिन्यात १५ तारखेनंतर जरा सुखाचाही अनुभव घ्या. गुरु बदलाने एखाद्या मोठ्या माणसाच्या मदतीने आपण प्रतिस्पर्ध्यावर मात करु शकाल.  नोकरी व्यवसायात जी माणसे आपल्याला त्रासदायक आहेत त्यांना परस्पर कसे दुर करायचे हे ह्या गुरुमुळे शक्य होते. वर्षभर हा योग आहे त्यामुळे प्लॅनींग करायला लागा. तिसरा राहू भावंडांची चिंता निर्माण करेल. यासाठी त्यांच्या संभाव्य समस्यांचा विचार करायला लागा.
मिथुन रास : राशीचा मालक बुध तिसर्या स्थानी आहे. तिसरे स्थान लिखाण, प्रकाशनाला अनुकूल स्थान आहे. आपला स्वभावही ज्ञान संपादन, लेखन याकडे झुकणारा असतो त्यामुळे असा संकल्प असेल तर नक्कीच अनुकूल काळ आहे.  तसेच शुक्राचे आगमनाने काही लिखाण हातून पुर्ण होईल. वर्षभर गुरु पंचम स्थानी म्हणजे शिक्षणाच्या स्थानी असेल. विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या संधीच्या शोधात असतील तर त्या दृष्टीने काही अनुकूल गोष्टी घडायला सुरवात होईल. कुटुंबात सुरु होत असलेले राहू भ्रमण काही बदल घडवून आणेल. घरगुती वाद उफ़ाळुन येणार नाहीत ना या कडे वर्षभर लक्ष द्या. जर मुळातच विसंवाद असेल तर काही मुद्यांवर आपण बोलायचे नाही असा संकल्प या महिन्यात करा. तोंडाचे/दातांचे वर्षभर आरोग्य संभाळा. यासाठी आतापासून दोन वेळा दात घासण्याचा संकल्प करा.
कर्क रास : राहू लग्न स्थानी किंवा चंद्रावरुन भ्रमण करताना स्वभावात किंवा व्यक्तिमत्वात फ़ेरबदल घडतात. या महिन्यापासून तुमच्या व्यक्तीमत्वात किंवा स्वभावात मोठे बदल घडायला सुरवात होईल. लोक तुम्हाला " तुम तो ऐसे न थे " असे म्हणुन दाद देतील क्वचीत टीका ही घडवतील. यामहिन्यात तुमच्या कुटुंब स्थानात अनेक ग्रहांचा राबता असेल. पाहूणे मंडळींच्या आगमनाने  कुटुंबात अनेक सुवार्ता येतील. शुक्राच्या आगमनाने भेळ पुरी सारखे पदार्थ उतरार्धात मनसोक्त चापाल. सुख स्थानी येणारा गुरु दशमावर द्रुष्टी टाकतो त्यामुळे नोकरी व्यवसायात वाढ होणार आहे तसेच खर्चही वाढणार आहेत. त्याचे कसे नियंत्रण कसे करायचे यावर या महिन्यापासून विचार करायला लागा.
सिंह रास : राहू बदल काही आर्थीक नुकसान करायला सुरवात करेल याबाबत वर्षभर जागरुक रहा. याची चुणूक नको असेल तरी या महिन्यात अनुभवाला आल्यास आश्चर्य वाटु देऊ नका. हा अनुभव कधीच नोकरदारांना येत नाही. आपण व्यावसायीक असाल तर जागरुक रहा आणि नुकसान टाळा. शुक्र तुम्हाला या महिन्याच्या उत्तरार्धात जास्त वेळ आरश्यासमोर उभा करेल. कधी नव्हे ते सुगंध तुम्ही खरेदी करुन वापराल. तुमच्या राशीचा स्वामी रवि १६ तारखेपर्यंत तुमच्या राशीत आहे. सोबत मंगळ ही आहे. तुमची पत/प्रतिष्ठा वाढेल असे ग्रहमान महिनाभर आहे. तिसरा गुरु आपल्या अनेक अपेक्षांची पुर्ती वर्षभर करणार आहे यावर विचार करायला लागा व कामाला लागा.
कन्या रास : महिनाभर खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. हा खर्च कसा नियंत्रणात ठेऊ असा प्रश्न तुम्हाला पडणार आहे. पण महिनाभरच हा प्रश्न असेल.  प्रवासाचे योग येणार आहेत. मानसीक दृष्टीने व्यस्तता जाणवेल.  गुरु बदलाने पुढील वर्षभरात घरात एक नविन पाहूणा किंवा मेंबर नक्कीच वाढणार आहे. उत्पन्न सुध्दा अचानक पणे वाढीचे योग या राहू बदलाने आलेले दिसती. अचानक काही नविन व्यावसायीक संधी लाभुन पुढील वर्षभर किंवा जास्त काळ आवक वाढल्याचे व्यावसायीकांना दिसेल. या नविन संधीचे स्वागत करायला या महिन्यात सज्ज रहा.
तूळ रास : आपल्या राशीसाठी नोकरी/व्यवसायातले बदलाची सुरवात ही या महिन्याची हेड लाईन आहे.  आपली नोकरी/ नोकरीचे स्थान किमान टेबल/ ऒफ़ीसचा पत्ता बदलाचे योग आहेत. अनेकांना हा बदल सुखावह वाटेल. नोकरी नसणार्यांना अचानक नोकरीच्या संधी चालून येतील. आपल्या व्यक्तीमत्वात भारदस्त बदल होण्याची सुरवात या महिन्यापासुन होत आहे. तूळ राशीचे लोक फ़ारसे जाड जूड नसतात पण या  खाल्ले ते अंगी लागायचे योग वर्षभर आहेत. व्यावसायीक नव्या व्यवसायाचा विचार सुरु करतील/प्रक्रिया सुरु होईल. आणि या वर्षभरात ते घडताना दिसेल.:
वृश्चिक रास : राशीचा स्वामी महिनाभर नोकरी/व्यवसायाच्या स्थानी आहे. तिथेच १५ सप्टेंबर पर्यंत रवी आहे. आपल्याला कामासाठी म्हणुन काही विशेष अधिकार प्राप्त होतील हे  काही काळासाठीच असतील. आपल्याला नोकरी/व्यवसायात अनेक आघाड्यावर लढावे लागेल. विजय निश्चित आहे पण लढाई शिवाय यश नाही त्यामुळे कंबर कसून तलवार उपसून तयार व्हा.  काही वेळा नुसती तलवार उपसली तरी काम भागेल. महिनाभर मोठीच पळापळ आणि धामधुम असेल.  गुरु बाराव्या स्थानी जात आहे. स्वत:चे घर व्हावे म्हणुन प्रयत्नात असाल तर त्याची सुरवात होईल. या निमीत्ताने घरासाठी खर्च करण्याचे योग वर्षभर येत आहेत. आत्ता पासून विचार करायला लागाल तर नक्कीच काही घडेल.
धनु रास: भाग्य स्थानी अनेक ग्रहांची गर्दी आहे त्यामुळे प्रवास योग आहेत. यात प्रवास नोकरी -व्यवसायाच्या निमीत्ताने असेल असे योग आहेत. काही चांगल्या घटना घडण्याची नांदी ही हे ग्रह देत आहेत. आठवा होणारा राहू मात्र वर्षभर विनाकारण चिंता तसेच पैसे ही देऊन जाणार आहे. राहू बदल होताच अशी चुणूक पहायला मिळते त्याचा अनुभव या महिन्यात घ्या. हा राहू अनपेक्षीत रित्या पैसे देण्याची प्रक्रिया सुरु होईल. उतरार्धात रवि दशमात आल्याने आपला शब्द महत्वाचा ठरेल. लाभ स्थानी येणारा गुरु वर्षभर अनेक आकांक्षाची पुर्ती करताना दिसेल. मनापासून एखादे स्वप्न पाहिले असेल तर ते वर्षभरात पुर्ण होणार आहे. त्यासाठी प्रयत्न करता काही घडणार नाही पण विचार तर करायला लागा की प्रार्थमिकता काय आहे?
मकर रास : दशमात येऊ घातलेला गुरु तुमचा कार्यभार वाढवणार आहे. वाढलेली कामे हातावेगळी करण्यासाठी वेगळी हातोटी अवलंबावी लागते. या महिन्यात वेळेचे नियोजन कसे करायचे यावर प्रशिक्षण घ्या म्हणजे वर्षभर कामाचा ताण सहन करता येईल. आठव्या स्थानी अनेक ग्रह आहेत. त्यात मंगळ आणि रवि आहे. आरोग्याच्या तक्रारी होतील पण फ़ार त्रास होऊ नये. पुढील काही महिने राहू सप्तमात असेल. मुळचा राहू या स्थानी असताना होणारे राहूचे भ्रमण भलत्याच गोष्टीत आपली गुंतवणुक होईल असे दर्शवितो. विवाहीत असाल तर जरा जास्त काळजी घ्या. सहसा मकर राशीचे लोक असल्या भलत्या मोहात पडत नाहीत पण काय सांगावे म्हणुन ही सुचना.
कुंभ रास : सहाव्या स्थानी राहू आला म्हणजे दुखणी होतात पण ती का होतात याचे कारण समजत नाही. यासाठी दुखणे आलेच तर वर्षभर डॉक्टर चांगला निवडा. वेळेवर औषधे घ्या. याही पेक्षा महत्वाचे म्हणजे पथ्य पाळा. पथ्यकर आहार घेतला म्हणजे निम्मे रोग येतच नाहीत. योग शिकला असाल तर वर्षभर नियमीतता ठेवा किंवा अन्य व्यायाम करा. त्याचा संकल्प याच महिन्यात करा. भाग्यातला वर्षभर येऊ घातलेला गुरु आपले जीवन फ़ुलवणार आहे. तिर्थयात्रा होतील त्याचे प्लॅनिंग करायला सुरवात करा.  विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश आहे तसेच संतती व्हावी असे वाटत असता या वर्षी हा योग आहे त्यासाठी नियोजन करा.
मीन रास: पंचमात राहू आला म्हणजे विद्यार्थी वर्गाने सावध रहावे. या काळात काही घोळ होणे असे अनुभव येऊ नयेत यासाठी  विद्यार्थ्यांनी वेळेवर अभ्यास करण्याची सवय या महिन्यापासून लावून घ्या. असे केले म्हणजे अभ्यास केला ते विचारलेच नाही आणि जे वाचले नाही त्यावर नेमका पेपर पडला असे म्ह्णण्याची वेळ येणार नाही.  प्रश्नपत्रिका नीट वाचा. परिक्षा क्रमांक तपासा. पुरवण्या नीट जोडा. पेपर लिहताना ऐन वेळी विसरु नये म्हणुन काही तंत्रे असतात ती शिका म्हणजे पुढील दीड वर्षे त्रास होणार नाही. हे असे लिहणे म्हणजे पालकांच्या खास करुन विद्यार्थ्यांच्या मातृवर्गाचे सुख हरपणार आहे. पण काळजी घ्या, हा सल्ला आपण आपल्या पाल्याला द्या.  काळजी करत बसु नका. तुम्ही म्हणाल मीन राशीत काय फ़क्त विद्यार्थी वर्गच असतो का ? तुमच्या राशीचा अधिपती गुरु अशुभ म्हणजे आठव्या स्थानी जात असल्याने प्रगतीला ब्रेक लागणार आहे. या साठी विचार करुन ठेवा.

Tuesday, August 8, 2017

८ सप्टेंबर पासून होणारे राहूचे राशी परिवर्तन

राहू हा ग्रह ज्याला वस्तुमान नाही असा आहे हे ज्योतिष शिकणार्या ज्योतिषप्रेमी मंडळींना माहीत असेलच. पुर्वाचार्यांनी राहूला वस्तुमान, आकार नसताना ग्रह म्हणुन मान्यता दिली आहे कारण हा जरी काल्पनिक बिंदू असला तरी याचे फ़लज्योतिषात परिणाम दिसतात.

राहू सिंह राशीतुन कर्क राशीमधे ८ सप्टेंबरला प्रवेश करतो आहे. जेंव्हा जेंव्हा राहू असा राशीबदल करतो तेव्हा अनेक फ़ळे अचानक पणे प्रदान करतो असा अनुभव आहे. ही फ़ळे वेगाने मिळतात, अनपेक्षीत असतात. कधी कधी नुसता आभास असतो, फ़ळे मिळत नाहीत असे ही दिसते. राहूबाबत अजून माहिती माझ्या ब्लॉगवर राहू महादशा - शाप की वरदान या लेखात या लिंकवर वाचा http://gmjyotish.blogspot.in/p/blog-page_25.html . ज्यांची राहू महादशा किंवा अंतर्दशा सुरु आहे अशांना राहू राशीबदलाची जोरदार फ़ळे मिळतील. पुढील काही महिन्यात शनि पुन्हा धनु राशीत तर गुरु तुळेत जाणार आहे. आपल्याला एकटा राहू फ़ळे देतो असे नाही.  विवीध राशीतल्या अनेक ग्रहांच्या फ़ळांचा तो एकत्रीत परिणाम असतो. याबाबत दिवाळी अंकातल्या वार्षीक राशीभविष्यात त्याबाबत विस्ताराने पाहू. नक्षत्रप्रकाश दिवाळी अंक प्रसिध्द करण्याचा मानस आहे त्याची संभाव्य तारीख लवकरच समजेल.

आता राशीवार फ़ळे पाहू - एखादा आठवडा कदाचित सर्व राशींवर राहूच्या राशीबदला बाबत लिहायला लागेल. ही फ़ळे लग्न रास माहित असेल तर तिकडुन ही पहावीत तशीच राशीकडुनही पहावीत.

मेष रास : मेष राशीला राहू चतुर्थ स्थानी येत आहे. चतुर्थ स्थान हे सुख स्थान आहे. या ठिकाणी राहू येणे फ़ारसे सुखदायक नसते. सुखाचा नाश येण्याचे योग आहेत. आपण घरात रहाता त्या संदर्भात एखादी घटना जी मनाला चुटपूट लावेल अशी घडण्याची शक्यता आहे. काही जणांना घर बदलावे लागेल.  रहाते घर जर नाईलाजास्तव बदलावे असेल तर त्या घराशी जुळवून घेताना होणारे बदल मनाला त्रास देतील.  ज्यांचे अश्विनी आणि भरणी नक्षत्र आहे त्यांना मित्रमंडळीत अचानक नविन मित्र जोडले जाण्याचा अनुभव येईल. हा जोडला गेलेला मित्र/मैत्रीण घरापर्यंत येऊ द्यायचा की नाही याचा अभ्यास करुनच त्याला घरी आणा. संततीचे काय सुरु आहे यावर दिड वर्षे लक्ष ठेवावे लागणार आहे. नोकरी व्यवसायात फ़ार काही वेगळे घडेल असे नाही. मागील पानावरुन पुढे चालू असा राहूचा प्रभाव असेल.

वृषभ रास : या राशीला राहू तिसरा येणार आहे. भावंडांच्या बाबतीत काही चिंता राहील. जे लोक प्रिंटींग व्यवसायात आहेत त्यांनी प्रुफ़ रिडींग बाबत सावधानी घ्या अन्यथा "ध" चा "मा" होऊन नुकसान होईल. वृषभ राशीच्या लोकांनी इमेल लिहताना सावधानता घ्या. इंटरव्ह्युला जाताना पुढील दीड वर्ष राहू काळ टाळून जा. कृतिका नक्षत्राला काहीसा त्रासदायक अनुभव ह्या किमान वर्षभरात येऊ शकतो. कृतिकेचे एक चरण मेषेतही आहे. ज्यांचे कृतिका नक्षत्र प्रथम चरण आहे त्यांची मेष रास असुनही काळ त्रासदायक आहे हे लक्षात ठेवावे. रोहीणी नक्षत्राला अनेक कामे जी आज पर्यंत साध्य झाली नाहीत ती पुढील वर्षभरात अचानक साध्य होताना दिसतील. हा अनुभव खास करून लेखन करणारे, प्रकाशक असणारे यांना येईल. मृग नक्षत्राचे दोन चरण वृषभेत तर दोन मिथुनेत आहेत. त्यांना ही राशीबदल फ़ारसा लाभदायक नाहीच उलट कटकटीचा आहे.

मिथुन रास : तुमच्या कुटुंबस्थानात राहूचे भ्रमण आहे.  मांसाहारी लोकांना या दिड वर्षात मांसाहाराची आठवण अनेक वेळा होईल. ज्यांचे दाताचे आरोग्य खराब आहे त्यांनी आपल्या दाताच्या आरोग्याबरोबर दुर्गंधी येऊन जवळच्या व्यक्तीला त्रास होणार नाही याबाबत जागरुक असावे. हा राहू गृहकलह निर्माण करणारा आहे. कारणे काहिही असतील. संभ्रम असो कि गैरसमज आपण जागरुक असा. आर्द्रा नक्षत्राच्या लोकांना फ़ारसा राहू बदलाचा त्रास नाही पण पुनर्वसु नक्षत्र ज्याची तीन चरने मिथुनेत तर एक चरण कर्क राशीत आहेत त्यांना पुढील काही महिने संकटे येऊ शकतात यास्तव येणार्या संकटाचा आधीच वेध घ्या. कशावरही आधीच विचार करुन पर्याय शोधून ठेवले असले म्हणजे फ़ारसा त्रास होत नाही.

कर्क रास : तुमच्या राशीतून राहूचे भ्रमण सुरु आहे. तुमच्या मनात अनेक संभ्रम होणे अपेक्षीत आहे. विचारांची दिशा फ़ार वेगळी होणे स्वाभावीक आहे. तुमच्या व्यक्तिमत्वात बदल होत असल्याचे अनेकांना जाणवेल. तुम्ही अचानक अनप्रेडीक्टेबल होत आहात असे इतरांना जाणवेल. पुष्य नक्षत्राला अचानक संपत्ती जमा करण्याचे योग आहेत. आश्लेषा नक्षत्राला हे राहूचे भ्रमण फ़ारसे उत्तम आहे असे नाही. आश्लेषा नक्षत्राला स्वत: चे काही वैचारीक प्रश्न असतात त्यात भर पडल्याचे जाणवेल. काही नविन वैचारीक बदल होणार आहेत त्यासोबत तुम्ही काही नविन विचार आत्मसात कराल किंवा नविन विचार धारेला जन्म द्याल.

सिंह रास : सिंह राशीला हे भ्रमण फ़ारसे चांगले नाही.  व्यावसायीक असाल तर हा राहू आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत कमी करेल किंवा अनावश्यक अनपेक्षीत खर्च वाढवेल. फ़ार मित्र वाढवणे असा मघा नक्षत्राचा स्वभाव नाही तरी नविन मित्र आपल्याला खड्यात घालणार नाहीत ना ह्याचा विचार अवश्य करा. पुर्वा नक्षत्राच्या लोकांनी कोणाची दोस्ती करायची यावरही विचार करुन ठेवा. त्यांनाही मैत्री खातर नुकसान संभवते. " तुमच्या साठी काय पण" असा डायलॉग मारणारे जरा सावध रहा असे या निमीत्ताने सांगावेसे वाटते. उत्तरा नक्षत्राचा एक चरण सिंह राशीत तर उरलेले तीन कन्या राशीत असतात सिंह रास उत्तरा नक्षत्र यांनी अनेक कामे साध्य करताना जास्तीचा खर्च होत नाही ना याचा विचार करावा नाहीतर "दर्द से दवा दुखदायक" असा अनुभव यायचा.

कन्या रास: गेले दिड वर्षे हा राहू तुम्हाला आर्थिक संकटात टाकून बसला असेल तर आता पैशाची आवक वाढताना दिसेल. मग कुणाला ती नोकरीतल्या बदलाने असेल तर कुणाला अन्य मार्गाने. उत्तरा नक्षत्राला मित्र काही चांगले काम किंवा चांगली नोकरी मिळवुन देण्यास सहायक होताना दिसतील. हा बदल सुखावह असेल असे नाही. त्रासदायक बदल असला तरी पैसे वाढवून मिळणार आहेत. चॉईस तुम्ही करा. हस्त नक्षत्राच्या लोकांना काही गोष्टी सहज साध्य होऊन पैसे जास्त मिळतील असे ग्रहमान आहे. एकंदरीत कुणाला कष्ट/त्रास /मानहानी जास्त पण पैसे येणार तर कुणाला पैसे मिळवण्याची ट्रीक साधणार हा फ़रक असणार आहे. तुमची रास अर्थतत्वाची असल्याने आपल्याला काय पदरात पडत आहे हा तुमचा विचार असतो म्हणुन हा फ़रक सांगीतला. चित्राचे दोन चरण कन्या राशीत आहेत त्यांना पैसे मिळणार आहेत आणि त्रास  आहे असे ग्रहमान आहे.

तूळा रास : एखादा मोठा सन्मान, किंवा अधिकाराचे पद मिळवताना नोकरीचे ठिकाण किमान टेबलाची जागा बदल घडणे करावेच लागते. पोर्ट फ़ोलीओ किंवा नोकरी/ व्यवसायात बदल असे योग आहेत. याचे चांगले परिणाम किंवा त्रासदायक परिणाम आहेतच. हे बदल अनपेक्षीत आहेत हे नक्की. ज्यांनी अजून नोकरी व्यवसायात पदार्पण केलेले नाही त्यांना अचानक नविन नोकरीच्या /व्यवसायाच्या संधी चालून येतील. " हारी बाजी को जितना मुझे आता है " असेही घडुन ज्या नोकरी/ व्यवसायाची अपेक्षा सोडली होती अश्या हुकलेल्या संधी पुन्हा चालून येतील. चित्राला हा बदल त्रासदायक आहे. स्वातीला नाही तर विशाखाला हा बदल जरा जास्तच त्रास देईल. तुमच्या साठी हा बदल म्हणजे शिक्षा म्हणुन बदली किंवा त्रास देण्यासाठी बदली असे असेल. विशाखा नक्षत्राच्या लोकांना व्यावसायीक काही संधी आल्याच तर पारखुन घ्या हे सांगणे गरजेचे आहे.

वृश्चिक रास : आपल्या भाग्यात राहू येत आहे. भाग्य स्थानातून राहू जात असताना तिर्थ यात्रा घडू शकतात. तिर्थ यात्रा करताना काही नियम असतात. भ्रष्टाचाराने पैसे मिळवुन लोकांना काशीला नेणारे उद्योग राजकीय नेते करतात. अश्या मंडळींनी केलेल्या तिर्थयात्रात सहभागी झाल्यावर फ़ारसे पुण्य लाभत नाही. अश्या यात्रा तुम्ही करणार का ? विचार करा. विशाखा नक्षत्राला अशी केलेली यात्रा एखादा अपघात तर घेऊन येणार आहे असे ग्रहयोग दर्शवितात. किंवा तुमच्या पित्याने घेतलेल्या निर्णयाने काही चुकीचे तर होणार नाहीना हे तपासावे लागेल. अनुराधा नक्षत्राला तुमची यात्रा कंपनी/ टुर्स व ट्रॅव्हल्सचा व्यवसाय लाभदायक ठरेल. जेष्ठा नक्षत्रवाले टुर अ‍ॅरेंजर्स असतील तर काही क्रियेटीव्ह टुर्स पॅकेजेस तयार करुन दाखवतील. एकंदरीत वृश्चिक राशीच्या लोकांना फ़िरण्याचे योग आहेत.

धनू रास : आपल्या राशीच्या लोकांना कर्क रास अष्टमस्थानात आणि त्या राशीतून राहूचे भ्रमण काही शारिरीक पिडा घेऊन येईल. आपली साडेसाती सुरु आहेच. त्यात दीड वर्ष हा त्रास आहे. ऑपरेशन्स किंवा दिर्घकाळ आजारातून जाण्याचे योग टाळावेत यासाठी असे काही झाल्यास खालील मंत्र जप केल्यास नक्कीच ह्या त्रासापासून सुटका होईल. उत्तराषाठाचे एक चरण धनू राशीत आहे त्यांना अनुभव येऊ शकतो.
अनेक रूपवर्णेश्च शतशोऽथ सहश:।
उत्पातरूपो जगतां पीडां हरतु मे तम:।।
ज्यांना मंत्र जप शक्य नाही त्यांनी भटक्या कुत्र्याला पोळी/भाकरी खाऊ घाला तेच फ़ळ मिळे. घरी कुत्रा असेल तर त्याची व्यवस्था पहा.  मूळ व पुर्वाषाठा नक्षत्राच्या व्यक्तींना आपले काही मित्र या काळात आपल्याला शेअर्स च्या टीप्स देतील त्या दुर्लक्ष न केल्यास फ़ायदा होईल. इन्शुरन्सचे पैसे मिळण्यात अडचण असेल तर मित्रांचे सहकार्य घ्या. या दोन नक्षत्रांना मित्रांच्या सहायाने धनलाभ संभवतो.

मकर राशी : उत्तराषाठा नक्षत्राच्या तीन चरणांचा सहभाग मकर राशीत आहे आणि हे नक्षत्र असलेल्या मकर राशीच्या लोकांना स्वत: ला त्रास नाही पण आपल्या वैवाहीक जोडीदाराला आजारपण/ अपघात अश्या विपत्तीला पहिले काही महीन्यात तोंड द्यावे लागेल अशी शक्यता आहे. सप्तमातला राहू हा काही काळ अचानक आय़ुष्यात काही व्यक्ती येण्याचा काळ दर्शवितो. मग ते प्रेमप्रकरण असेल किंवा अनैतीक संबंध असतील. जे असले निर्णय घ्यायच्या वयात आहेत अश्यांना खास करुन उत्तराषाठा व्यक्तीच्या लोकांनी या प्रकरणापासून अलिप्तता बाळगावी. विवाह ठरत असल्यास चौकशी जास्त करावी. ज्यांचे विवाह ठरण्यास उशीर होत होता अश्या श्रवण नक्षत्राच्या लोकांना झट मंगनी पट ब्याह असा अनुभव येईल. धनिष्ठा नक्षत्राचे दोन चरण मकर राशीत आहेत त्यांना व्यावसायीक असतील तर पार्टनरने अडचणीत आणले अश्या संकटांना सामोरे जाण्याची शक्यता दिसते. आपल्या वैवाहीक जोडीदाराच्या चारित्र्यावर उगाचच शंका घेण्याचा काळ आहे. ही शंका घेताना मकर राशीच्या लोकांनी उगाचाच पराचा कावळा होत नाही ना ? याची काळजी घ्या.

कुंभ राशी : आपल्या सहाव्या स्थानातून राहू जाताना खासच काळजी करावी असे ग्रहमान आहे. रोगाचे निदान ना होणे. झाले तरी योग्य औषध ना मिळणे. गुप्त शत्रुंच्या कारवाया असे ग्रहमान आहे. डॉक्टर/ वैद्य याच बरोबर आजार असता ज्योतिषाची मदत घेतलीत तर निदान योग्य होईल हे जरा धाडसाचे मी विधान मी करतो आहे पण जेव्हा सर्व प्रयत्न हरतात तेव्हा काही वेगळे मार्ग नक्कीच उपयोगी ठरावेत. शततारका नक्षत्राला हा त्रास फ़ारसा नाही पण पुर्वा भाद्रपदाचे जे तीन चरण कुंभेत आहेत अश्या व्यक्तीला हा त्रास नक्कीच संभवतो. यास्तव कोणता आजार, काय ट्रीटमेंट या कडे राहू बदलानंतर पहिले काही महिने लक्ष द्या. उगाच औषधे घेत राहू नका नाहीतर " आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी " अस एक नाट्यपद जुन्या नाटकात होते तसा अनुभव यायचा.

मीन रास : पाचव्या स्थानातून होणारे राहूचे भ्रमण पूर्वा भार्द्रपदा नक्षत्राच्या शेवटच्या चरणाला चांगले नाहीत. मुलांच्या कारणाने चिंता राहील. आपली संतती अडचणीत कशाने येऊ शकेल याचा शोध घ्या आणि त्यावर पर्याय शोधून ठेवा. मीन राशीच्या उत्तराभाद्रपदा नक्षत्राला क्रिडा प्रकार, कला, विचार प्रदर्शनातून चांगला लाभ या काळात मिळु शकेल. रेवती नक्षत्राला मात्र आपल्या विचारांनी भ्रमीत झाल्याचा भास काही काळ होईल. संतती अपेक्षा असणार्यांना या काळात नक्कीच संतती लाभ आहे. पाचवा राहू कधी काळी संतती होताना अडथळे निर्माण करतो हा अनुभव काहींना येऊ शकतो. गर्भपात ही टर्म पहिल्या तीन महिन्यात नैसर्गीक प्रक्रिया आहे हे खास करुन स्त्रीयांनी लक्षात ठेवावे. विकृत गर्भ निसर्ग ठेऊन घेत नाही. म्हणुन ही बातमी कळाल्यास तपासण्या करा. आजकाल अगदी पहिल्या महिन्यापासून सोनोग्राफ़ीत विकृती निदान होते. रेवती नक्षत्रांच्या स्त्रीयांनी गर्भ राहीला असता हे राशीभविष्य वाचून चिंता करण्या ऐवजी श्रीकृष्णाच्या आवडत्या मंत्राचा जप करावा.

शुभंभवतु