Sunday, August 27, 2017

सप्टेंबर २०१७ चे राशीभविष्य आणि नक्षत्रप्रकाशच्या दिवाळी अंकांची घोषणा.

ज्योतिषप्रेमी लोकहो, सप्टेंबर महिन्याचे राशीभविष्य आपल्याला सुपूर्त करताना मनात खुप आनंद होत आहे याचे एक कारण दरमहिना राशी भविष्य लिहीण्याचा संकल्प करुन एक वर्ष पुर्ण होत आहे. २०१६ सप्टेंबर पासून मी राशीभविष्य लिहायला सुरु केले. नक्षत्रप्रकाश दिवाळी अंक २०१६ लगेचच प्रसिध्द केला. याला वाचकांचा खुप प्रतिसाद मिळाला.

आता नक्षत्रप्रकाशचा दिवाळी अंक ३० सप्टेंबर २०१७ रोजी म्हणजे दसर्याच्या मुहूर्तावर फ़ेसबुकवर प्रसिध्द करण्याचा मानस आहे. त्यामुळे ज्यांनी फ़ेसबुकच्या नक्षत्रप्रकाश ज्योतिष समुहावर आपले सदस्यत्व नोंदवले नसेल त्यांनी त्वरेने नोंदवा कारण हा अंक इथे प्रथम प्रसिध्द होईल. अर्थात अनेक लोकांना याची लिंक पुढे पाठवायला मी प्रोत्साहन देतो त्यामुळेच वाचकांची संख्या वाढते. नेहमी प्रमाणे दिवाळी अंकातही ज्योतिष विषयक अनेक लेख असतील व वार्षिक राशीभविष्य ही असेल यामुळे अक्टोबर महिन्याचे वेगळे राशीभविष्य असणार नाही.

सप्टेंबर महिन्यात दोन महत्वाचे ग्रह राशीबदल करत आहेत. ८ सप्टेंबरला राहू व केतू राशी बदलत आहेत. याचे स्वतंत्र भविष्य मी आधीच प्रसिध्द केले आहे. http://gmjyotish.blogspot.in/2017/08/blog-post.html याच बरोबर या महिन्यात १२ तारखेला गुरु ही तूळ राशीत जात आहे. शनि पुढील महिन्यात पुन्हा धनू राशीत जात आहे. याचे एकत्रित परिणाम मी दिवाळी अंकात देईनच पण तो पर्यंत या महिन्याच्या भविष्यात काही तात्कालिक परिणाम वाचा.

राहू जेव्हा राशी बदलतो तेव्हा त्याचे परीणाम अकस्मात आणि जोरदार घडतात. याची चुणूक या महिन्यात दिसेलच. पाहूया राशीवार भविष्य,

मेष रास: या महिन्यात १२ सप्टेंबरला गुरू सप्तमात येत आहे. ८ सप्टेंबरला राहू चतुर्थात येत आहे. पंचमात असलेला मंगळ खेळ खेळण्यात महिनाभर उत्साह येईल. चतुर्थातला राहू सुखस्थानी आल्याने आपल्या सुख कमी होणार आहे. घर बदलण्याचे योग येऊ शकतात. यामुळे नविन घरी जागा बदलल्यामुळे झोप न लागणे, वस्तु जागेवर न सापडणे असे घडेल त्यामुळे किंचीत अस्वास्थ्य येऊ शकते. अनेकांना काहीना काही कारणाने घर बदलावे लागेल , शहर बदलावे लागेल यामुळे रोजची घडी विस्कटली जाऊनही अस्वास्थ्य येऊ शकते. व्यावसायीक लोकांना व्यवसायस्थानी गुरु आल्याने व्यवसाय वृध्दी अनुभवायला मिळणार आहे . अगदी लगेचच नाही पण आपल्या उत्पन्नात वाढ होणार आहे. चंद्रावर गुरुची दृष्टी वर्षभर पडल्याने मेषेच्या मुलींची तर लग्ने वर्षभरात होतील. पण मुलींनी स्थळ पहायला होकार द्यायला हवा. मगच पालक हालचाल करु शकतील ना ?
वृषभ रास: या महिन्यात तुमच्या सुखाच्या स्थानी ग्रहांची गर्दी या महिन्यात आहे. रवि, मंगळ आणि बुध हे आहेतच शिवाय  १५ तारखेनंतर राशीचा स्वामी शुक्र  सुखस्थानात आल्याने  सुखात भर पडेल.शुक्र चतुर्थात असताना वाहन सुख, घरात उत्तम कौटुंबिक वातावरण असल्याने मिळणारे सुख वाढते. तुम्ही कष्ट करायला कंटाळत नाही पण या महिन्यात १५ तारखेनंतर जरा सुखाचाही अनुभव घ्या. गुरु बदलाने एखाद्या मोठ्या माणसाच्या मदतीने आपण प्रतिस्पर्ध्यावर मात करु शकाल.  नोकरी व्यवसायात जी माणसे आपल्याला त्रासदायक आहेत त्यांना परस्पर कसे दुर करायचे हे ह्या गुरुमुळे शक्य होते. वर्षभर हा योग आहे त्यामुळे प्लॅनींग करायला लागा. तिसरा राहू भावंडांची चिंता निर्माण करेल. यासाठी त्यांच्या संभाव्य समस्यांचा विचार करायला लागा.
मिथुन रास : राशीचा मालक बुध तिसर्या स्थानी आहे. तिसरे स्थान लिखाण, प्रकाशनाला अनुकूल स्थान आहे. आपला स्वभावही ज्ञान संपादन, लेखन याकडे झुकणारा असतो त्यामुळे असा संकल्प असेल तर नक्कीच अनुकूल काळ आहे.  तसेच शुक्राचे आगमनाने काही लिखाण हातून पुर्ण होईल. वर्षभर गुरु पंचम स्थानी म्हणजे शिक्षणाच्या स्थानी असेल. विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या संधीच्या शोधात असतील तर त्या दृष्टीने काही अनुकूल गोष्टी घडायला सुरवात होईल. कुटुंबात सुरु होत असलेले राहू भ्रमण काही बदल घडवून आणेल. घरगुती वाद उफ़ाळुन येणार नाहीत ना या कडे वर्षभर लक्ष द्या. जर मुळातच विसंवाद असेल तर काही मुद्यांवर आपण बोलायचे नाही असा संकल्प या महिन्यात करा. तोंडाचे/दातांचे वर्षभर आरोग्य संभाळा. यासाठी आतापासून दोन वेळा दात घासण्याचा संकल्प करा.
कर्क रास : राहू लग्न स्थानी किंवा चंद्रावरुन भ्रमण करताना स्वभावात किंवा व्यक्तिमत्वात फ़ेरबदल घडतात. या महिन्यापासून तुमच्या व्यक्तीमत्वात किंवा स्वभावात मोठे बदल घडायला सुरवात होईल. लोक तुम्हाला " तुम तो ऐसे न थे " असे म्हणुन दाद देतील क्वचीत टीका ही घडवतील. यामहिन्यात तुमच्या कुटुंब स्थानात अनेक ग्रहांचा राबता असेल. पाहूणे मंडळींच्या आगमनाने  कुटुंबात अनेक सुवार्ता येतील. शुक्राच्या आगमनाने भेळ पुरी सारखे पदार्थ उतरार्धात मनसोक्त चापाल. सुख स्थानी येणारा गुरु दशमावर द्रुष्टी टाकतो त्यामुळे नोकरी व्यवसायात वाढ होणार आहे तसेच खर्चही वाढणार आहेत. त्याचे कसे नियंत्रण कसे करायचे यावर या महिन्यापासून विचार करायला लागा.
सिंह रास : राहू बदल काही आर्थीक नुकसान करायला सुरवात करेल याबाबत वर्षभर जागरुक रहा. याची चुणूक नको असेल तरी या महिन्यात अनुभवाला आल्यास आश्चर्य वाटु देऊ नका. हा अनुभव कधीच नोकरदारांना येत नाही. आपण व्यावसायीक असाल तर जागरुक रहा आणि नुकसान टाळा. शुक्र तुम्हाला या महिन्याच्या उत्तरार्धात जास्त वेळ आरश्यासमोर उभा करेल. कधी नव्हे ते सुगंध तुम्ही खरेदी करुन वापराल. तुमच्या राशीचा स्वामी रवि १६ तारखेपर्यंत तुमच्या राशीत आहे. सोबत मंगळ ही आहे. तुमची पत/प्रतिष्ठा वाढेल असे ग्रहमान महिनाभर आहे. तिसरा गुरु आपल्या अनेक अपेक्षांची पुर्ती वर्षभर करणार आहे यावर विचार करायला लागा व कामाला लागा.
कन्या रास : महिनाभर खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. हा खर्च कसा नियंत्रणात ठेऊ असा प्रश्न तुम्हाला पडणार आहे. पण महिनाभरच हा प्रश्न असेल.  प्रवासाचे योग येणार आहेत. मानसीक दृष्टीने व्यस्तता जाणवेल.  गुरु बदलाने पुढील वर्षभरात घरात एक नविन पाहूणा किंवा मेंबर नक्कीच वाढणार आहे. उत्पन्न सुध्दा अचानक पणे वाढीचे योग या राहू बदलाने आलेले दिसती. अचानक काही नविन व्यावसायीक संधी लाभुन पुढील वर्षभर किंवा जास्त काळ आवक वाढल्याचे व्यावसायीकांना दिसेल. या नविन संधीचे स्वागत करायला या महिन्यात सज्ज रहा.
तूळ रास : आपल्या राशीसाठी नोकरी/व्यवसायातले बदलाची सुरवात ही या महिन्याची हेड लाईन आहे.  आपली नोकरी/ नोकरीचे स्थान किमान टेबल/ ऒफ़ीसचा पत्ता बदलाचे योग आहेत. अनेकांना हा बदल सुखावह वाटेल. नोकरी नसणार्यांना अचानक नोकरीच्या संधी चालून येतील. आपल्या व्यक्तीमत्वात भारदस्त बदल होण्याची सुरवात या महिन्यापासुन होत आहे. तूळ राशीचे लोक फ़ारसे जाड जूड नसतात पण या  खाल्ले ते अंगी लागायचे योग वर्षभर आहेत. व्यावसायीक नव्या व्यवसायाचा विचार सुरु करतील/प्रक्रिया सुरु होईल. आणि या वर्षभरात ते घडताना दिसेल.:
वृश्चिक रास : राशीचा स्वामी महिनाभर नोकरी/व्यवसायाच्या स्थानी आहे. तिथेच १५ सप्टेंबर पर्यंत रवी आहे. आपल्याला कामासाठी म्हणुन काही विशेष अधिकार प्राप्त होतील हे  काही काळासाठीच असतील. आपल्याला नोकरी/व्यवसायात अनेक आघाड्यावर लढावे लागेल. विजय निश्चित आहे पण लढाई शिवाय यश नाही त्यामुळे कंबर कसून तलवार उपसून तयार व्हा.  काही वेळा नुसती तलवार उपसली तरी काम भागेल. महिनाभर मोठीच पळापळ आणि धामधुम असेल.  गुरु बाराव्या स्थानी जात आहे. स्वत:चे घर व्हावे म्हणुन प्रयत्नात असाल तर त्याची सुरवात होईल. या निमीत्ताने घरासाठी खर्च करण्याचे योग वर्षभर येत आहेत. आत्ता पासून विचार करायला लागाल तर नक्कीच काही घडेल.
धनु रास: भाग्य स्थानी अनेक ग्रहांची गर्दी आहे त्यामुळे प्रवास योग आहेत. यात प्रवास नोकरी -व्यवसायाच्या निमीत्ताने असेल असे योग आहेत. काही चांगल्या घटना घडण्याची नांदी ही हे ग्रह देत आहेत. आठवा होणारा राहू मात्र वर्षभर विनाकारण चिंता तसेच पैसे ही देऊन जाणार आहे. राहू बदल होताच अशी चुणूक पहायला मिळते त्याचा अनुभव या महिन्यात घ्या. हा राहू अनपेक्षीत रित्या पैसे देण्याची प्रक्रिया सुरु होईल. उतरार्धात रवि दशमात आल्याने आपला शब्द महत्वाचा ठरेल. लाभ स्थानी येणारा गुरु वर्षभर अनेक आकांक्षाची पुर्ती करताना दिसेल. मनापासून एखादे स्वप्न पाहिले असेल तर ते वर्षभरात पुर्ण होणार आहे. त्यासाठी प्रयत्न करता काही घडणार नाही पण विचार तर करायला लागा की प्रार्थमिकता काय आहे?
मकर रास : दशमात येऊ घातलेला गुरु तुमचा कार्यभार वाढवणार आहे. वाढलेली कामे हातावेगळी करण्यासाठी वेगळी हातोटी अवलंबावी लागते. या महिन्यात वेळेचे नियोजन कसे करायचे यावर प्रशिक्षण घ्या म्हणजे वर्षभर कामाचा ताण सहन करता येईल. आठव्या स्थानी अनेक ग्रह आहेत. त्यात मंगळ आणि रवि आहे. आरोग्याच्या तक्रारी होतील पण फ़ार त्रास होऊ नये. पुढील काही महिने राहू सप्तमात असेल. मुळचा राहू या स्थानी असताना होणारे राहूचे भ्रमण भलत्याच गोष्टीत आपली गुंतवणुक होईल असे दर्शवितो. विवाहीत असाल तर जरा जास्त काळजी घ्या. सहसा मकर राशीचे लोक असल्या भलत्या मोहात पडत नाहीत पण काय सांगावे म्हणुन ही सुचना.
कुंभ रास : सहाव्या स्थानी राहू आला म्हणजे दुखणी होतात पण ती का होतात याचे कारण समजत नाही. यासाठी दुखणे आलेच तर वर्षभर डॉक्टर चांगला निवडा. वेळेवर औषधे घ्या. याही पेक्षा महत्वाचे म्हणजे पथ्य पाळा. पथ्यकर आहार घेतला म्हणजे निम्मे रोग येतच नाहीत. योग शिकला असाल तर वर्षभर नियमीतता ठेवा किंवा अन्य व्यायाम करा. त्याचा संकल्प याच महिन्यात करा. भाग्यातला वर्षभर येऊ घातलेला गुरु आपले जीवन फ़ुलवणार आहे. तिर्थयात्रा होतील त्याचे प्लॅनिंग करायला सुरवात करा.  विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश आहे तसेच संतती व्हावी असे वाटत असता या वर्षी हा योग आहे त्यासाठी नियोजन करा.
मीन रास: पंचमात राहू आला म्हणजे विद्यार्थी वर्गाने सावध रहावे. या काळात काही घोळ होणे असे अनुभव येऊ नयेत यासाठी  विद्यार्थ्यांनी वेळेवर अभ्यास करण्याची सवय या महिन्यापासून लावून घ्या. असे केले म्हणजे अभ्यास केला ते विचारलेच नाही आणि जे वाचले नाही त्यावर नेमका पेपर पडला असे म्ह्णण्याची वेळ येणार नाही.  प्रश्नपत्रिका नीट वाचा. परिक्षा क्रमांक तपासा. पुरवण्या नीट जोडा. पेपर लिहताना ऐन वेळी विसरु नये म्हणुन काही तंत्रे असतात ती शिका म्हणजे पुढील दीड वर्षे त्रास होणार नाही. हे असे लिहणे म्हणजे पालकांच्या खास करुन विद्यार्थ्यांच्या मातृवर्गाचे सुख हरपणार आहे. पण काळजी घ्या, हा सल्ला आपण आपल्या पाल्याला द्या.  काळजी करत बसु नका. तुम्ही म्हणाल मीन राशीत काय फ़क्त विद्यार्थी वर्गच असतो का ? तुमच्या राशीचा अधिपती गुरु अशुभ म्हणजे आठव्या स्थानी जात असल्याने प्रगतीला ब्रेक लागणार आहे. या साठी विचार करुन ठेवा.

No comments:

Post a Comment