Wednesday, February 8, 2017

विवाह योग आणि आपल्या अपेक्षा

साधारण पणे तुळशीचे लग्न लागले म्हणजे आधीच्या वर्षी ठरलेली आणि पहिल्या मुहुर्तावर करायची लग्ने पार पडतात. हा महिना कार्तिक महिना असतो. मग मार्गशिर्ष महिना. प्रथे प्रमाणे त्यानंतर येणारा पौष महिना विवाहाची बोलणी करायची असोत की प्रत्यक्ष विवाह पार पाडायचा असो वर्ज समजला जातो. मागिल महिन्यात ही प्रथा शास्त्र संमत नाही यावर मी लिहले होते. जसा पौष महिना संपतो तसा लग्नाचा विषय वेग पकडतो. ज्यांचे बाशींगबळ जोरात असते किंवा ज्यांचे लग्न एक तडजोड आहे हा विचार पक्का असतो त्यांचे विवाह लवकर होतात. या उलट अतिचिकित्सक आई- वडील आणि विवाह योग्य मुले ( वधु- वर ) असतील तर मात्र विवाह मागे पडतो. गिनीज काय लिमका काय कोणत्याही रेकॉर्ड तोड पध्द्तीने स्थळांची चिकीत्सा केली जाते. वधु-वरांनी आंधळेपणाने एकमेकांच्या गळ्यात माळा घालाव्यात असे कोणीही म्हणणार नाही

आधीच विवाह  शिक्षण मग करीयर करायचे म्ह्णुन लांबवला जातो त्यात वधू किंवा वर यांच्या अटी असतात. काही अटी तर हास्यास्पद असतात.  काही मुलींच्या अटी असतात की मी इंजिनीयर झाले मग मुलगा एम सी एम किंवा एम सी ए नको. बी एस सी तर नकोच. मुलाची कर्तबगारी पहायला कोणी तयार नसते. बायो-डाटाच परतवुन लावले जातात. केवळ एक शैक्षणीक अर्हता पाहून एखाद्याला स्थळाला पुढे न पहाताच डावलणे माझ्या मते योग्य नाही. त्याचे कारण असे की जे युवक किंवा युवती पुणे -मुंबई सारख्या शहरात न रहाता अन्य जिल्हयात रहातात त्यांना दहावी किंवा बारावी नंतर काय करावे याचे निटसे मार्गदर्शन मिळालेले नसते. कधी कधी उत्तम मार्गदर्शन असुनही पालकांकडे इंजिनीयरींगचे शिक्षण आपल्या मुलाला किंवा मुलीला द्यावे असे वाटत नसते किंवा आर्थिक पाठबळ नसते. याचा अर्थ त्या मुलांची बुध्दीमत्ता कमी आहे असे नाही. याचा बोध नक्कीच पत्रिकेवरुन होत असतो. अनेक इंजिनीयर झालेल्या मुलांना किंवा मुलीला सुयोग्य नोकरी मिळत नाही. या उलट एखाद्या आय टी कंपनीत एम सी ए किंवा एम सी एस झालेली मुले पटकन नोकरी मिळवतात व आपला उत्कर्ष साधतात. थोडक्यात उपवर मुलीच्या किंवा मुलाच्या दृष्टीने एखादे क्वॉलीफ़िकेशन सुयोग्य नाही असे ठरवु नये. त्या ऐवजी स्थळाबरोबर आणखी एक डॉक्युमेंट न मागता उपलब्ध होते ते म्हणजे पत्रिका किंवा जन्मवेळ, जन्मतारिख आणि जन्म स्थळ. याचा मागोवा घेऊन उपवर मुलांच्या मनात  असलेली क्वालीफ़िकेशन व त्याला जोडुन असलेली करीयरची ग्रोथ होईल की नाही ही शंका दुर करता येते. जाणकार ज्योतिषी जर गुण जुळत असतील तर विचारले असता मुलगा कर्तबगार आहे किंवा नाही नक्की सांगु शकतो.

मुलगाच कर्तबगार असला पाहिजे हा सुध्दा विचार एकांगी आहे असे मला वाटते. आज आपण मुलगा काय किंवा मुलगी काय यांना एकसारखेच वाढवतो.  मुली सुध्दा आजकाल कर्तबगार संधी मिळाली तर होऊ शकतात. दोघेही कर्तबगार असावेत हे म्हणणे म्हणजे घराकडे  दुर्लक्ष करण्यासारखे आहे. मुलगा जुजबी नोकरी करतो किंवा अशी नोकरी करतो ज्यामुळे घराकडे लक्ष देणे शक्य होते असे स्थळ कर्तबगार मुलींनी नाकारणे योग्य नाही. तो कर्तबगार नाही पण जबाबदारीने वागतो का याची खात्री झाली तरी पुरे. मागे एकदा माझा नवरा कर्तबगार नाही हे एक वर्षाने समजल्यावर घटस्फ़ोट घेऊन दुसरे लग्न केल्यास कसे असा प्रश्न एका मुलीने मला पत्रिका दाखवून विचारला होता. मी तिला तुझा नवरा प्रेमळ आहे आणि जबाबदार असेल तर तु तुझ करीयर कर पण घटस्फ़ोट घेऊ नकोस असा सल्ला दिला होता.  http://www.maayboli.com/node/61108   हा त्या संदर्भातला लेख.

अतिशय कमी शिकलेल्या पण बुध्दीमान महिलांनी कर्तबगार नसलेल्या पण आयुष्यभर फ़क्त नोकरी करुन पैसे आणणे इतके काम केलेल्या जबाबदार पुरुषांबरोबर यशस्वी संसार केलेला मी पाहिला आहे. या महिलांनी नोकरी न करता घर संभाळलेले आहे. थोडेसे फ़ावल्या वेळात अर्थार्जन केलेले आहे. घरातले बॅंकीग व्यवहार त्यांनीच संभाळलेले आहेत. दुसर्या उदाहरणात सोसायटीत पाणी न आल्यास सोसायटीच्या वतीने टॅकर बोलावण्यासाठी त्यांना कोणत्याही पुरुषाशी सल्लामसलत करण्याची गरज वाटत नाही. हार्ट अ‍ॅटॅक आलेल्या सासर्यांना त्यांनी प्रथम अ‍ॅडमीट करुन नंतरच नवर्याला आणि नातेवाईकांना कळवताना त्यांचा आत्मविश्वास मी एका महिलेत पाहिला आहे. मुलांना कोणते शिक्षण द्यायचे म्हणजे मुलांना करीयर सहजपणे करता येईल हे अभ्यासकरुन शोधणारी महिला मी पाहिली आहे. तीने एकटीने मुलांची लग्ने  जमविली आहेत. प्रेमविवाह करण्याची इच्छा असलेल्या मुलाला किंचीत जातीचा फ़रक असताना पाठींबा देऊन मग दोन्ही घर जोडुन मुलगा आणि पिता यांचे संबंध या मुद्यावरुन न बिघडु देता कुशलपणे एकटीने हा प्रश्न हाताळणारी समर्थ महिला सुध्दा मी पाहिली आहे.

कर्तबगार महिला उच्चपदस्थ असताना जबाबदार पुरुष नक्कीच संसाराचा समतोल संभाळु शकतो. कारण त्याच्या जवळ घरातल्या सगळ्या व्यक्तींना एकत्र बांधुन ठेवण्यासाठीचा वेळ असेल. यावर उपवर मुलींनी नक्की विचार करुन असे स्थळ स्विकारायला काही हरकत नसावी. त्या उच्च पदावर असताना हे सगळे घरगुती प्रश्न असतील, घरातल्या नोकर वर्गाकडुन घरगुती कामे करुन घ्यायची असतील. पुढे जाऊन मुलांची प्रगती पुस्तके पाहून शाळेतल्या पालकांच्या मिटींगला जायचे असेल. अशी भुमिका पार पाडण्यासाठी जबाबदारीने एखादे दुकान चालवणारा मुलगा नवरा म्ह्णुन स्विकारण्यास हरकत नसावी. शाळेतला शिक्षक नवरा सुध्दा हे रोल माझ्या मते जबाबदारीने पार पाडेल. उपवर मुलींनी हा विचार केलातर माझ्या मते विवाह पुढे ढकलले जाण्याचे एक कारण कमी होईल.

मुलगी इंजिनीयर झाली म्हणजे तिला इंजिनीयर मुलगाच हवा हा सामाजिक दृष्टीकोन सुध्दा बरोबर नाही हे या निमीत्ताने सांगावेसे वाटते. शैक्षणीक अर्हता किंवा क्वालीफ़िकेशन फ़ार तर ही व्यक्ती इंजिनीयरींगचा अभ्यास करुन किंवा सायन्स/कॉमर्स/आर्ट्स चा अभ्यासक्रम घेऊन तो उत्तम मार्गाने पास होऊ शकते इतकी बुध्दीमत्ता दर्शवते. पण जेव्हा प्रश्न करीयरचा असतो तेव्हा उपलब्ध शिक्षणाचा उपयोग फ़क्त ३०% असतो. ७० टक्के वापर हे त्या व्यवसायाशी/नोकरीशी संबंधीत अनेकांशी जुळवून घेण्याच्या कौशल्याचा असतो. जे लोक अनेकांशी उत्तम जुळवून घेत आपल्याकडे नसलेल्या पण इतरांकडे असलेल्या कौशल्याचा वापर आपल्या उत्कर्षासाठी करुन घ्यायची क्षमता निर्माण करतात. असे लोक त्यांच्या पेक्षा उत्तम क्वॉलीफ़िकेशन असलेल्या व्यक्तींपेक्षा उत्तम यश संपादन करतात असे दिसुन आलेले आहे. अर्थातच अश्या व्यक्ती संसार करताना सुध्दा जास्त यशस्वी रित्या नातेसंबंध जपण्यात यशस्वी होताना दिसतात.

याचाच अर्थ असा की एखाद्या गोल्ड मेडलीस्ट डिग्री होल्डर पेक्षा चांगले करीयर एखादी त्याच्या पेक्षा कमी मार्क्स असलेली व्यक्ती करु शकते व तीच व्यक्ती कुटुंबात किंवा संसारात समन्वय साधण्यात पण यशस्वी होताना दिसते. सबब नुसत्या क्वॉलीफ़िकेशन पाहुन एखादे स्थळ नाकारणे म्हणजे उत्तम स्थळ नाकारणे होऊ शकते. उदा. अनेक डॉक्टर्स ना त्यांच्या पेशंटशी उत्तम संवाद न साधता आल्यामुळे व्यावसायीक यश मिळवता येत नाही.  लग्नाला उपवर मुलगा डॉक्टर आहे म्हणजे सगळे चांगले आहे असे समजण्यात काही अर्थ नाही. तो किती चांगले पेशंट हाताळु शकतो, पेशंट्सचा विश्वास किती संपादन करु शकतो याकडे पहाणे गरजेचे आहे.

पती पुण्यातलाच हवा, पुण्यात रहाणारा असेल तर पौढ रोडला रहाणारा हवा आणि पौढरोडला त्याचा स्वत:चा ब्लॉक हवा, सासुसासरे यांच्या बरोबर तीन बेडरुमचा ब्लॉक असलेला नको अश्या अटी लग्न जमताना पत्रिकेत असलेल्या अडचणींपेक्षा कठीण असतात. मुलगा गोराच किंवा स्मार्ट हवा, इंजिनीयर सुध्दा हवा, आय़ टी मध्ये नोकरी असलेला हवा, किमान पगार ८०,०००/- हवा, त्याचा स्वतंत्र ब्लॉक हवा, वेगळा रहाण्यासाठी तयार असलेला हवा, पुढे स्वजातीत हवा ( आई- वडीलांच्या अपेक्षा )  हे सर्व जुळून येणे कठीण असते. अनेक विवाह ह्या अश्या अटींनी लांबतात. यासाठी आपल्या अटी किती लॉजीकल आहेत हे तपासणे गरजेचे आहे.

आई- वडीलांनी पसंत केलेल्या मुलीच्या गळ्यात मी हार घालायला तयार आहे असे सांगणारी पिढी आता नाही. पण एकाच भेटीत किंवा पहाण्याच्या कार्येक्रमात सर्व काही ठरणे असेही शक्य नसते. या करता उपवर वधु- वराचा संवाद होणे गरजेचे आहे. या संवादात त्यांनी काय बोलायचे याची पुर्व तयारी सुध्दा गरजेची आहे.

वरील सर्व जाचक अटी नसताना अनेक वेळा मंगळाचा दोष आहे म्हणुन मुलींच्या पत्रिका नाकारल्या जातात. ज्योतिष शिकताना आम्हाला पहिल्याच वर्गात आमच्या डॉ. धुंडीराज पाठक सरांनी आम्हाला कोणाच्याही मृत्युचे भविष्य वर्तवु नका असे सांगीतले होते.  अजुनही मुलीच्या पत्रिकेत मंगळ पाहिला की अनेक ज्योतिष्यांच्या तोंडी "वैधव्य योग" असे शब्द आल्यामुळे अनेक मुलींच्या स्थळांना मुलांकडुन नकार येतो. मंगळ दोष खरच आहे का ? साध्या कुंडलीत तो असेल तर भावचलीत कुंडलीत आहे का ? हे पहायला अनेक ज्योतिषी तत्पर नसतात. खर तर मंगळाच्या दोषात विवाह लांबतो ते मंगळामुळे नसुन मंगळाच्या भितीमुळे आहे. कर्केचा ( नीच राशीतला ) अस्तंगत मंगळ, बुधाच्या राशीतला ( ३ व ६ आकडे लिहलेल्या स्थानातला मंगळ ) हा सौम्य असतो. या शिवाय दाते पंचांगात वर्णन केल्याप्रमाणे विवीध स्थानी उच्च किंवा स्वराशीचा मंगळही निदोष समजला जातो. या शिवाय मंगळावर शुभ ग्रहांची पुर्ण दृष्टी असेल तरीही मंगळाचा दोष नाहीसा होतो हे मुलीच्या पालकांनी समजुन घ्यायला हवे. माझ्या मते दाते पंचांगात असलेला लेखच पत्रिका पाठवताना सोबत जोडून पाठवला व आपल्या मुलीचा मंगळ कसा सौम्य आहे याचे किमान वाचन मुलाकडच्या पालकांनी केल्यास मतपरिवर्तन नक्कीच होईल. कधी कधी ज्योतिषाची जाण नसताना हे वाचन करुन समजले नाही तर ज्योतिषाचा सल्ला घेऊन निर्णय घेण्याची उपरती नक्कीच होईल.

लग्न उशीरा होणे ही सामाजीक समस्या आहे असे मी मानतो. जसा योग्य वयापुर्वी विवाह करणे ही सामाजीक समस्या आहे तसे वेळेवर विवाह न होणे ही सुध्दा समस्या आहे. विवाह वेळेवर होण्यासाठी आपणच निर्माण केलेल्या नको त्या अपेक्षांच्या भिंती पाडुन पुढे विचार करायला हवा. या साठी हा लेखन प्रपंच.

नितीन जोगळेकर
joglekar.nitin@gmail.com

हा लेख कसा वाटला ? आपण खाली आपल्या प्रतिक्रिया जरुर लिहा. माझे विचार पटणार नाही कदाचित पण विचार प्रक्रिया सुरु होईल.

3 comments:

  1. IT'S REAL FACT OF SOCIETY AND YOUR THOUGHTS ARE REALLY GOOD ALL PEOPLE NEED TO THINK LIKE YOU.

    ReplyDelete
  2. या निमित्ताने चांगल्या विषयाला हात घातलात . तुमचे अनेक धन्यवाद 🙏

    ReplyDelete