Tuesday, November 7, 2017

IVF सक्सेस स्टोरी

कालचा दिवस म्हणजे ६ नोव्हेंबर २०१७ माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस होता. माझ्या जातकजोडप्या पैकी पुरुषाचा फ़ोन आला व त्याने त्यांना कन्या संतती झाल्याची गोड बातमी दिली.  हे जोडपे माझ्या संपर्कात मागच्या वर्षी डिसेंबर २०१६ मधे आले. संतती हा प्रश्न होता. स्त्रीच्या फ़ेलोपीन ट्युब्ज ब्लॉक असल्याने स्त्रीबीज गर्भाशयात येत नव्हते. यावर IVF अर्थात टेस्ट ट्युब बेबी हा प्रयोग डॉक्टरी शास्त्रानुसार सुरु होता.

IVF तसे तंत्र काही नविन नाही. १९७८ साली ह्याची सुरवात झाली. ज्या स्त्रीयांच्या फ़ेलॊपीन ट्युब्ज ब्लॉक आहेत अश्यांना संतती देण्यासाठी हे तंत्र उत्तम आहे. या तंत्रात स्त्रीचे स्त्रीबीज जे फ़ेलॊपीन ट्युब वाटे गर्भाशयात येऊ शकत नाही ते शस्त्रक्रियेने बाहेर काढून पुरुष बीजाशी त्याचा संयोग शरीराबाहेर घडवून पुन्हा पाच सहा दिवसांनी गर्भाशयात सोडले जाते.  यामुळे मासीक पाळी बंद होण्याच्या वयात सुध्दा स्त्रीया माता होऊ शकतात.

भारतात हर्षा वर्धन रेड्डी बुरी या भारतीय पहिल्या टेस्ट ट्युब बेबीचा जन्म १६ ऑगस्ट १९८६ साली झाला. माझ्याकडे हे जोडपे आले तेव्हा या प्रयोगाला २०१६ साली ३० वर्षे पुर्ण होऊन गेलेली होती. दुदैव असे की या जोडप्याची IVF आधी पाच वेळा फ़ेल गेली होती. कारण तसेच आहे. या प्रयोगात भारतात ५५ ते ६० % वेळेला यश मिळते. याचाच अर्थ हा प्रयोग अनेक वेळा केला तरच यशस्वी होतो. इथे खरे ज्योतिषशास्त्र काम करु शकते. जेव्हा हा प्रयोग यशस्वी होण्याची ज्योतिषशास्त्राने शक्यता आहे तेव्हा हा प्रयोग केला तर कमी वेळा प्रयोग करुन अर्थात कमी खर्चात जोडपे आपल्या अपत्याला जन्म देऊ शकेल. प्रयोग अनेक वेळा फ़ेल गेला की मन उदास होणे, मुल होण्याची उमेद संपणे ही मानसीक स्थिती न येता जोडपे दोन चार प्रयत्नात आनंदी होऊ शकेल.

मी या जोडप्याच्या पत्रिका तपासून संतती सुखाच्या शक्यता पाहिल्या. मला असे लक्षात आले की नजीकच्या महादशा अंतर्दश्या तसेच गोचरीचे ग्रह ही ह्या स्त्रीला गर्भधारणेसाठी अनुकूल आहेत. याच काळात जर गर्भधारणा झाली तर ही स्त्री आई होण्याची शक्यता अधीक असल्यामुळे मी त्यांना काही तारखा सजेस्ट केल्या.

१८-४-२०१७ हा दिवस माझ्यासाठी ह्या जोडप्याच्या इतकाच आनंदाचा होता कारण ह्या जोडप्याची IVF या वेळेला यशस्वी होऊन ती स्त्री गर्भवती झाली होती.

हे यश हातातून जाते आहे की काय अशी परिस्थिती एका सोनोग्राफ़ी परिक्षेनंतर आली. मला त्या स्त्रीचा फ़ोन आला की तीच्या जुळ्या मुलापैंकी एकाचे हृदयाचे ठोके बंद पडले आहेत. आता काय करायचे ? मी त्यांना गर्भ संरक्षक देवता श्रीकृष्ण आणि कुलदेवीची आराधना करायला सांगून माझ्या देवाची आराधना केली. माझे दोन चार दिवस अस्वस्थतेत गेले. मला फ़ोन करायची छाती होईना. सातव्या दिवशी माझी चुलत बहीण आली आणि तीने मला तीच्या जावेच्या तीळ्या पैकी एकाचे ठोके बंद झाल्यावर जुळे जन्माला कसे आले याची कहाणी सांगीतली. मी लगेच इंटरनेटवर पाहीले असता. http://americanpregnancy.org/multiples/vanishing-twin-syndrome/ हा कन्सेप्ट वाचनात आला. ज्यात स्पष्ट उल्लेख होता की जुळ्या मुलांच्या गर्भापैकी एकाचे ह्रुदय बंद पडले तर पहिल्या तीन महिन्यात तो गर्भ आतल्या आत जिरतो आणि दुसरे बालक सुखरुप जन्माला येते.

ह्या स्त्रीने ज्या अर्थी मला फ़ोन केला तेव्हा त्यांच्या डॉक्टर्स ना हा कन्सेप्ट माहित नव्हता ? त्यांनी ह्या स्त्रीला घाबरु नकोस तुला अजुन तीन महिने व्हायचे आहेत. पहिल्या तीन महिन्यात एक बाळाचा गर्भ जिरुन दुसरे बालक सुखरुप जन्माला येण्याची शक्यता खुपच जास्त आहे हे सांगायला नको होते ? कधी कधी मला डॉक्टर्स असे का वागतात याची कारणे समजत नाहीत.

हे ज्ञान किंवा कन्सेप्ट डॉक्टर्स नी सांगीतला असता तर ती गर्भवती तणावाखाली येऊन मला फ़ोन केला नसता. मी काय केले फ़क्त विश्वास दिला. हेच डॉक्टर्स ने करायला हवे होते.

मग ह्या जोडप्यातील पतीचा फ़ोन दोन चार दिवसापुर्वी आला. सिझेरीयन साठी योग्य दिवस कोणता असे तो विचारत होता. मी ही ह्या दिव्यातून नुकताच गेलो होतो. माझ्या मुलीने सिझेरीयनने तीच्या मुलाला नुकताच जन्म दिला. तेंव्हा आपल्या समुहावरील विजयानंद पाटील यांच्याशी मी चर्चा केली असता यात फ़ार ढवळा ढवळ न करण्याचा सल्ला त्यांनी दिला. मला ते म्हणाले की श्रीकृष्ण देवता गर्भरक्षक आहे. स्मरण करा आणि बाकी डॉक्टर्स वर सोडा. मी माझ्या स्वत: च्या बाबतीत स्वत: चे डोके चालवत नाही. नेहमी आपल्या पेक्षा अनुभवी लोकांचा सल्ला घेतो.

दोन चार दिवसामागे हाच सल्ला मी दिला. काल फ़ोन आला की या जोडप्याला कन्या रत्न झाले आहे. काल पासून मी खुष आहे. माझा ज्योतिषीय प्रयोग यशस्वी झाला. ही माझी नाही तर त्या जोडप्याची सुध्दा खात्री आहे.

आता तांत्रिक बाबी कडे जाऊ. जर स्त्रीचा पंचमेश बिघडला असेल तर वर उल्लेखली त्या प्रमाणे गर्भधारणेत अडचणी संभवतात. या IVF तंत्राने दुर होण्यासारखी परिस्थिती असेल तर ती स्त्री गर्भवती होऊ शकते. पण तांत्रीक बाजू पाहिली असता स्त्रीच्या गर्भाशयातून स्त्री बीज बाहेर काढणे, त्याचा पुरुष बीजाशी संयोग घडवणे आणि ते पुन्हा ५-६ दिवसांनी फ़लीत झाल्याची खात्री करुन गर्भाशयात सोडणे, गर्भाशयाने ते स्वीकृत करुन गर्भाची वाढ होणे यात गुरु ग्रहाचे मोठे कार्य असते. मुळ पत्रिकेत अनेक वेळा पंचमेश सुस्थितीत असूनही स्त्रीचा गुरु वक्री किंवा अशुभ स्थानी असता , त्याच्या सोबत युतीत व्ययेश असता किंवा अशुभ ग्रहांची दृष्टी असता हे कार्य खात्रीने होत नाही.

सर्व ज्योतिषी हेच छाती ठोक पणे सांगतात की तुमच्या पत्रिकेतले शुभ ग्रह आयुष्यभर शुभ फ़ळे देत नाहीत. त्यांच्या महादशा/अंतर्दशा असताना, गोचर ग्रह अनुकूल असताना जास्त फ़लदायी होतात. तसेच अशुभ ग्रहांचे असते. जेव्हा अशुभ ग्रह त्यांच्या महादशा/अंतर्दशा असताना जास्त अशुभ फ़लदायी होतात.

मी  यात अचुक काळ शोधला ज्या काळी पंचमेशाचे अशुभत्व कमी होऊन गर्भ धारण होईल तसेच गुरु अनुकूल असल्यामुळे गर्भाची वाढही खात्रीने होईल. या पध्दतीने अनेक वेळा हा प्रयोग करायला मिळाला तर IVF चे फ़ेल्य़ुअर प्रमाण कमी होऊन जोडप्याचा खर्च वाचेल आणि धीर ही खचणार नाही. अश्या जोडप्यांनी माझ्याशी संपर्क करावा यासाठी हा लेखन प्रपंच.

No comments:

Post a Comment