Monday, November 11, 2019

जन्मकुंडली तयार करताना जन्मवेळ नेमकी कोणती घ्यावी ?

आपल्या पैकी अनेकांना माहित आहे की जन्मकुंडली तयार करण्यासाठी जन्मवेळ, जन्मतारीख आणि जन्मस्थळ ह्या तीन गोष्टी आवश्यक असतात. या तीन गोष्टी का आवश्यक असतात असा प्रश्न केला तर तो एक वेगळा चर्चेचा विषय होईल. हा विषय ज्योतिषशास्त्राचा गाभा असल्यामुळे चर्चा फ़क्त ज्योतिष शिकलेल्यांना समजेल आणि इतर सामान्य ज्योतिषप्रेमींना समजणार नाही म्हणून हा विषय न घेता फ़क्त जन्मवेळ कोणती घ्यावी या विषयावर चर्चा करु. याचाच अर्थ असा की जन्मवेळ बरोबर नसेल तर आपण दिलेल्या जन्मवेळेनुसार आलेली जन्मकुंडली बरोबर न आल्यामुळे आपल्याला कितीही विद्वान ज्योतिषाने सांगीतलेले भविष्य चुकेल. आपला वेळ, आपण या ज्योतिषाला दिलेली फ़ी वाया जाईल या शिवाय चुकीचा सल्ला बरोबर मानून घेतलेले निर्णय चुकल्याने किती नुकसान होईल ?

जन्मकुंडली तयार करताना जन्मवेळ नेमकी कोणती घ्यावी ?


ही सर्व चर्चा करण्यापुर्वी बालकाच्या जन्माची प्रक्रिया आधी नीट समजाऊन घ्यायला हवी.

बालक जन्माला येते ही प्रक्रिया माझ्या मते तीन टप्यात पुर्ण होते. यातील पहिला टप्पा,  बालक आईच्या शरीरातून बाहेर येते. ही प्रक्रिया नैसर्गीक म्हणजे सिझेरीयन न करता होणारी प्रसुती असो की सिझेरीयन पध्दतीने होणारी प्रसुती असो. या दोनही टप्यात आईच्या शरीरापासून बालक सुटे झाले तरी ते आपले श्वसन सुरु करत नाही.आईच्या शरीरापासून सुटे झालेले बालक लगेचच रडत ही नाही.

याचे कारण आता पाहू. आईच्या गर्भाशयापासून एक २० इंच किंवा ५० सेंटीमीटर नळी ज्याला मराठीत नाळ असे म्हणतात ती बालकाच्या बेंबीला जोडलेली असते. आईपासून बालक सुटे झाले तरी ही नाळ जोडलेली असते. जो पर्यंत ही नाळ जोडलेली आहे तो पर्यंत आई आणि बालकामध्ये नाते नसते. बालक आईपासून सुटे झाले तरी ते आईच्याच शरीराचा भाग असते. कारण त्याला ऑक्सीजन अर्थात प्राणवायू आईने घेतलेल्या श्वासामधूनच मिळत असतो.

दुसरा टप्पा जेंव्हा नाळ कापली जाते ती आहे. या नंतर बालकाच्या शरीरातील ऑक्सीजन ची पातळी हळू हळू खाली जाऊ लागते. नुकतेच जन्मलेले बाळ फ़ारसे हालचाल करत नसते त्यामुळे त्याची ऑक्सीजनची गरज ही कमी असते. पण साधारण पणे तीन ते चार मिनीटात बालकाच्या शरीरातील ऑक्सीजनची पातळी खुपच कमी होते.  असे झाले की बालकाचा मेंदू सुचना देतो आता स्वतंत्र श्वसन करण्याची आवश्यकता आहे. ही सुचना मिळताच आयुष्यात प्रथमच बालक जोर लाऊन फ़ुफ़्फ़ुसे उघडते आणि पहिला श्वास घेते आणि रडते.

बालकाच्या जन्माच्या प्रक्रियेत तिसरा टप्पा म्हणजे बालकाने पहिला श्वास घेणे हा आहे.   असे करताना  बालकाला प्रचंड शक्ती खर्च करावी लागते.याचा बालकाला खुप त्रास होऊन बालक रडते.  आईच्या पोटात जागा कमी असल्याने फ़ुफ़्फ़ुसे म्हणजे हवा भरण्याची पिशवी जशी नवी प्लॅस्टीक बॅग चिकटलेली असते तश्या अवस्थेत असते. बालक जोर लावताच त्यात हवा भरली जाते. पण हे करताना बालकाला रडू येते आणि ते जोराने रडते.

कै. डॉ भा.नि. पुरंदरे हे आंतराष्ट्रीय किर्तीचे स्त्रीरोग तज्ञ अर्थात गायनोकॉलॉजिस्ट होते. त्यांनी  शल्यकौशल्य नावचे आत्मचरित्र लिहले आहे. त्यांच्या या आत्मचरित्रामधे त्यांनी प्रथम बाळ रडते, ती जन्मवेळ जन्मकुंडली तयार करण्यासाठी घ्यावी असे सांगीतले आहे. तुम्ही म्हणाल या स्त्रीरोग तज्ञ किंवा प्रसुतीतज्ञ डॉक्टर साहेबांचा आणि ज्योतिषशास्त्र विषयाचा काय संबंध ? त्यांचे म्हणणे प्रमाण का मानायचे ?

कै. डॉ . भा.नि. पुरंदरे हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे स्त्रीरोग तज्ञ अर्थात गायनोकॉलॉजिस्ट होते तसेच ते ज्योतिषी सुध्दा होते. त्यांनी त्यांच्या शल्यकौशल्य ह्या आत्मचरित्रात पान १८९ ते पान १९४ ह्या पाच पानांवर अनेक जन्मकुंडली  दिल्या आहेत.  जन्मकुंडलीचा अभ्यास, एखादी केस हाताळण्यासाठी डॉक्टर्स ना कसा उपयोग होतो यावरही ह्या पुस्तकात दिले आहे.

त्यांच्या मते एखादी व्यक्ती शेवटचा श्वास बाहेर टाकते हा जर मृत्यु मानला तर पहिला श्वास घेते हा जन्म मानला पाहिजे. ह्या गोष्टीच्या समर्थनासाठी एक हायपोथीकल केस घेऊ. जर नाळ कापण्यापुर्वी मातेला पोटेशियम सायनाईड सारखे विष दिले गेले. असे विष क्षणात मातेच्या शरीरात परसते. तसेच ते नाळे मार्फ़त बालकापर्यंत येऊ शकते. यामुळे आई आणि बालकाचा मृत्यु होऊ शकतो. परंतु नालविच्छेदनानंतर म्हणजे नाळ कापल्यावर असे घडणार नाही. कारण आईच्या शरीराचा आणि बालकाचा नाळेचा संबंध तेंव्हा नसेल.

नुकतेच जन्माला आलेले बालक ही स्वतंत्र श्वास घेऊ लागते. बालक स्वतंत्र श्वास घेऊ लागते याची खुण म्हणजे बालक जेंव्हा प्रथम रडते ती वेळ असते. हीच जन्मवेळ घ्यावी असे भारतातील बहुतांशी ज्योतिषांनी मान्य केलेले आहे.

आपण विचाराल काही केसेस मधे बालक रडत नाही तर काय करायचे ? कोणती जन्मवेळ घ्यायची ? आपण थ्री इडीयड्स चित्रपटात पाहीले असेल. बालकाला अश्यावेळी मिडवाईफ़ किंवा नर्सेस आणि डॉक्टर्स पाठीवर थोपटतात. चिमटे सुध्दा काढतात. यामागे उद्देश असा असतो त्याने वेदना होऊन हातपाय हलवावेत. असे केले की त्याच्या शरीरामधे ऑक्सीजन पातळी झपाट्याने खाली जाते आणि बालक स्वत: श्वास घेण्यासाठी फ़ुफ़ुसे उघडते. अर्थातच हे केल्यावर बहुतांशी बालके रडतात.

असेही घडत असेल की बालके सुखरुप श्वासोश्वास करु लागतात पण मात्र रडत नाहीत. त्या केस मधे ह्या दरम्यानची वेळ घेणे याला पर्याय नाही. पण ९०% बालके रडतात असे गृहीत धरले आणि ती वेळ नोंदली गेली तर जन्मवेळ  मिनीटांच्या हिशोबात अचूक असेल.

जितकी जन्मवेळ अचूक तितके बालकाचे भविष्य बरोबर येते. अर्थात यासाठी ज्योतिषी निष्णांत असला पाहीजे. गेल्या ५० वर्षांपासून केपी अर्थात कृष्ण्मुर्ती पध्दतीन जन्मकुंडलीचा अभ्यास केला जातो. ही पध्दत पारंपारीक पध्दतीपेक्षा जास्त अचूक असली तरी यासाठी जन्मवेळ मात्र अचूक असावी लागते. पारंपारीक पध्दतीमधे जे ज्योतिषी स्पष्ट्ग्रह पाहूनच भविष्य सांगतात त्यांचे ही भविष्य अचूक असते.

यावर आणखी एक प्रश्न सगळे विचारतील की आमची जन्मवेळ आम्ही रडलो तेंव्हा नोंद्लेली आहे किंवा नाही हे कसे समजावे ? फ़ारच कमी ज्योतिषी ह्यासाठी जन्मवेळेचे करेक्शन करुन भविष्य सांगतात. पण यासाठी जन्माला आल्यानंतरच्या घटना पडताळून ही वेळ निश्चीत केली जाते. स्वत: कृष्णमुर्ती महोदयांनी यासाठी बर्थ टाईम करेक्शन असे तंत्र शोधून काढले आहे. हे तंत्र सुध्दा पुढच्या पिढीतील ज्योतिषी अजून विकसीत करत आहेत.

याचर्चेचा निष्कर्श काढला तर इथून पुढे जन्माला येणार्या बालकांची जन्मवेळ अचूक नोंदणे आवश्यक आहे. नुकतीच जन्माला आलेली बालके स्वत: तसे करु शकणार नाहीत. यामुळे ही जबाबदारी आपला विश्वास असो किंवा नसो ती बालकांच्या वडीलांची आहे. बालकाने ज्योतिषावर विश्वास ठेवायचा की नाही हा निर्णय त्याला घेऊ द्यावा. पण त्याच्या जन्माची अचूक वेळ नोंदवण्याची जबाबदारी मात्र सर्वप्रथम बालकाच्या वडीलांनी घ्यावी.

मला कल्पना आहे की ह्या विषयावर अनेक प्रश्न येणार आहेत. मी त्यातले योग्य प्रश्न निवडून याची समर्पक उत्तरे देईन. मी स्वत: प्रसुतीतज्ञ नाही. यामुळे या विषयावरील माहीती वाचूनच मी ही चर्चा करत आहे. मानवी शरीर हे १००% आजच्या सायन्स ला समजलेले नाही. असे असताना बालक नेमके कसे प्रथम रडते यावर एखादी अजून थेअरी असेल. आजच्या चर्चेचा हा विषय नाही. जर शेवटचा श्वास सोडणे म्हणजे मृत्यु मानला तर पहिला श्वास घेणे हा जन्म मानावा आणि त्याचे इंडिकेटर म्हणजे जन्माला आलेल्या बालकाचे प्रथम रुदन अर्थात रडणे आहे.

हा किंचीत तांत्रिक विषय मी माझ्या पध्दतीने समजाऊन सांगीतला.  मीच प्रथम हा सांगीतला असा माझा दावा नाही. अनेकांनी या विषयी लिहले आहे. आपण ही माहिती वाचण्यासाठी जो वेळ दिलात त्यासाठी धन्यवाद ! ही माहिती जर आवडली असेल तर इमेल सबस्क्राईब करा म्हणजे नविन पोस्ट येताच आपल्याला इमेल वर याची सुचना मिळेल.  आपण सर्वांना समजेल या भाषेत ज्योतिष विषयावरील मुलभूत गोष्टींची चर्चा करत राहू. यामुळे अगदी सर्वांना ती समजेल.

1 comment:

  1. Really a vry nice blog i really appreciate all your efforts ,thank you so mch for sharing this valuable information with all of us.
    Best NEET Coaching in Delhi

    ReplyDelete